मुंबई- विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दयावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधक धमकीची भाषा वापरत आहेत, ती संसदीय लोकशाहीला धोकादायक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र त्यांच्या टीकेला उत्तर हवे असेल तर त्यांनी चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र केवळ टीका करायची आणि चर्चेपासून पळ काढायचा हीच विरोधकांची भूमिका आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी कायम ठेवली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टोलचा मुद्दा, आदर्श घोटळा आणि एलबीटी या मुद्दय़ांवर राज्यपालांच्या अभिभाषणातून ठोस आश्वासन न मिळाल्यास त्यांचे अभिभाषण होऊ देणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला.अधिवेशन सुरळीत चालावे या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांनी येणे अपेक्षित होते. राज्याच्या राजकारणातील ही प्रथा विरोधक वेगळ्या दिशेने नेत असल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांकडे सध्या कोणतेही नवीन मुद्दे नाहीत.डोळ्यांसमोर ठेवून ते केवळ राजकारण करत आहेत. मात्र सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने या अधिवेशनात निर्णय घेईल. राज्यपालांचे अभिभाषण हे महत्त्वाचे आहे. ते होऊ न देण्याची विरोधकांनी दिलेली धमकी दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊनच अधिवेशनाचा कालावधी चार दिवसांचा ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









