
मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास कोणतीही अडचण नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विशेष अधिवेशनापूर्वी होईल. त्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गांधीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारला येत्या पंधरा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनाही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यातील जनतेसाठी विधानसभेत काम करणार आहे. विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांकरता काँग्रेस निश्चितच सरकारला पाठिंबा देईल. मात्र सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणा-या गोष्टी सरकारकडून होणार असतील, तर त्याला सभागृहाबरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरूनही विरोध केला जाईल. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, सर्व समाजघटकांना दिलेली आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास आपोआप हे पद काँग्रेसला मिळण्यात काही अडचण येणार नाही. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक सक्षम नेते या पदासाठी दावेदार आहेत. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्यानुसार नेत्याची निवड होईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारने आता राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे प्रश्न बाजूला राहू नयेत. सध्या कापूस केंद्रांची आवश्यकता आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. सध्या व्यापारी कापूस उत्पादक शेतक-यांची लूट करत आहेत, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे झालेले नुकसान, कोकणातील भातशेतीचे झालेले नुकसान, डेंग्यूवर नियंत्रण आदींबाबत लवकर निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षाही या वेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे भाजपशी साटेलोटे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे साटेलोटे असल्याचे आता जनतेसमोर आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तातडीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचे बोलले जात होते. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंब्यावरून त्यांचे साटेलोटे असल्याचे शिक्कामोर्तब झाले, अशी टीकाही या वेळी ठाकरे यांनी केली.









