
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – दोन वेळा मतदान करा, साता-यात मतदान केल्यानंतर पुन्हा मुंबईत मतदान करा आणि दु-यांदा मतदान करताना शाई पुसायला विसरु नका असे धक्कादायक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी निवडणूक आयोगाकडे माफी मागितली आहे. अशा प्रकारचे वक्तव्यकरून संभ्रम आणि गैरसमज निर्माण केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आयोगाने हे प्रकरण बंद करावे अशी विनंती ही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
रविवारी २३ मार्च रोजी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली. पवारांच्या या विधानावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने पवारांना गुरुवारपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.









