
शिर्डी दि. ३० – शिर्डीच्या विकासासाठी साईबाबा ट्रस्टने विकास आराखडा तयार केला आहे. या कामासाठी १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव ट्रस्टने सरकारकडे पाठवला आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळय़ासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करा, असा प्रस्तावही ट्रस्टने दिला, अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. यावेळी देशासह परदेशातूनही कोटय़वधी भाविक तसेच पर्यटक नाशिकला भेट देतील. हे भाविक शिर्डीतही दाखल होणार असल्याने त्यांच्या सोयीसुविधांसाठी तसेच तीन वर्षानी साईबाबा समाधी शताब्दी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचा विकास करण्यासाठी १२०० कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी द्यावी. तसेच शिर्डीच्या विकासासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी ट्रस्टने सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात केली आहे.
याबाबत बुधवारी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ ढवळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लख्मी गौतम आणि साईबाबा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिर्डीच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक येथे होणा-या कुंभमेळय़ात सुमारे १ कोटी भाविक उपस्थित राहतील. त्यापैकी जवळपास २५ लाख भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होतील. या पार्श्वभूमीवर सरकारने विविध विकासकामांसाठी १९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अहमदनगर-मनमाड या २३ किमीच्या बायपास रोडसाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
येथे येणा-या लाखो भक्तांना पाणी, सुरक्षा, चांगले रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही शिंदे म्हणाले.









