शिवरायांची आठ पत्रे सापडली

images
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. याशिवाय आग्र्याला पोहोचण्यापूर्वी ते मथुरेला गेले होते, या मतप्रवाहला बळकटी देणारी छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रे उपलब्ध झाली आहे. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने शनिवारी शिवाजी महाराजांची अन्य अप्रकाशित सात पत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. ही पत्रे नक्कल आणि तालिकांच्या स्वरुपात आहेत, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शनिवारी दिली.
सावंत म्हणाले, ‘येथील पुराभिलेखागारातून ही पत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यावर गेली सहा वर्षे संशोधन सुरू होते. ‌१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. त्यानंतर ते २५ दिवसांत राजगडावर पोहचल्याचा मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार ते चार महिन्यांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी स्वराज्यात पोहोचले. शिवाजी महाराजांच्या ३ ऑक्टोबर १६६६ रोजीच्या पत्रात त्यांनी ‌मथुरेतील जयकृष्ण चोबे याला वर्षासन दिल्याची नोंद आहे. म्हणजे महाराज ३ ऑक्टोबर १६६६ पर्यंत मथुरेतच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आग्र्याहून सुटका झाल्यानंतर ते किमान ४७ दिवस मथुरेतच थांबल्याचे दिसते. सहाजिकच शिवाजी महाराज नोव्हेंबर महिन्यात राजगडावर पोहोचले या प्रवाहाला पत्रातून बळकटी मिळते.’
‘जयकृष्ण आणि जयराम चोबे यांनी वर्षासन आणि संकल्पित दिल्याची सनदही मिळाली आहे’ असे सांगून सावंत म्हणाले, ‘शिवाजी महाराज सप्टेंबर महिन्यात राजगडावर पोहचले अशी खबर औरंगजेबला देणारी मिर्झाराजे जयसिंग यांची पत्रे आहेत. महाराजांनी स्वतः राजगडावर पोहोचलो अशी अफवा पसरवली असावी किंवा दुसऱ्या कोणाला तरी शिवाजी बनवून पाठविले असावे असा एक तर्क करता येतो. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयामागे शहाजी महाराजांचे एक सरदार रघुनाथ पंडित अमात्य हनुमंते यांचे मोठे सहकार्य होते. संशोधकांना सापडलेल्या ३ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात हनुमंते यांची ‘वार्षिक नेमणूक करून कर्नाटक देश तुम्हा स्वाधीन केला’ अशी नोंद आहे. त्यांना एक लाख पाच हजार होन ठरवून दिले असेही पत्रात नमूद आहे. याशिवाय विशाळगडाच्या संदर्भातील पत्रात (१६ मार्च १६७१) हवालदार दुधाजी आहीरराऊ यांच्या नावाची नोंद असून १४ एप्रिल १६७१ रोजीचे हे पत्र विशाळगडावरील कदिम तैनातीचे आहे. २६ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात त्रिंबकजी काकास कर्नाटकातील वलदाऊर मामले चंदी हे गाव वतन दिल्याचे म्हटले आहे.’ पत्रकार परिषदेला पुराभिलेखागाराचे अभिलेखापाल गणेश खोडके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. देविका पाटील, अमित अडसुळे आदी उपस्थित होते.
१६६९ सालातील एक प‌त्र मिळाले असून त्यात मिरासदार, कारकूनांची नावे आहेत. या पत्रात दोघा तृतीयपंथ्यांनी शिवाजी महाराजांकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना उदरनिर्वाह करण्याची परवानगी देण्यात आली होती.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + = thirteen