शिवसेना सत्तेसाठी लाचार!- राणे

images
कणकवली -राजकारण हे उद्धव ठाकरे यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्यास त्यांचे आमदार फुटतील, अशी भीती त्यांच्या मनात आहे. म्हणूनच, बाळासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान सोडून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज केली आहे.
शिवसेनेला मंत्रिपदं हवी आहेत खरी, पण त्यांच्यापैकी कुणातही मंत्रिपदासाठी लागणारी गुणवत्ता नाही, अशी चपराकही राणेंनी लगावली आहे. शिवसेनेनं कोकणी जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कालपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा दौरा सुरू असतानाच, भाजप-शिवसेनेत पॅच-अप झाल्याचीही चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना महत्त्वाची खाती मिळणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवरच, नारायण राणेंनी उद्धव यांच्यावर धारदार ‘प्रहार’ केला.
उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे पर्यटनच असल्याची खिल्ली उडवून राणे म्हणाले की, कोकणात येणाऱ्या उद्योगांना शिवसेनेचा विरोध आहे. कोकणी माणसानं सेनेला ताकद दिली, पण सेनेनं कोकणी माणसाची फसवणूकच केली आहे. स्वाभिमानाच्या गप्पा मारणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. ती कुणाचं काय भलं करणार? राज्यात विरोधात बसणारी शिवसेना केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. कारण, राजकारण हे उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, अशी जळजळीत टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेचे आमदार फुटतील, या भीतीनेच ते सत्तेसाठी लाचार झाल्याचंही राणेंनी सुनावलं.त्यामुळे आता संध्याकाळी उद्धव ठाकरे कसा पलटवार करतात आणि ‘सामना’ जिंकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two − 1 =