
रत्नागिरी- रत्नागिरीतील जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करण्यासाठी निघालेला शिवसेनेचा आंदोलन मोर्चा पोलिसांनी एक किलोमीटर अलीकडेच रोखून धरला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. आज सकाळपासूनच जैतापूरमधले वातावरण तणावाचे आहे.
दरम्यान, अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करणारच, असा निर्धार शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केला आहे. पोलिसांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी प्रकल्प कार्यालय परिसर, राजापूर, जैतापूर, नाटे परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. हा प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी सेनेने स्थानिकांच्या मदतीने सुरूवातीपासूनच विविध आंदोलने केली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा हा प्रकल्प सुरू करण्याच्या हलचालींना वेग आला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत प्रकल्पाचे कार्यालयदेखील सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेने हे कार्यालय उद्धवस्त करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार आज शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आयोजन केले. मात्र, शिवसैनिकांना कार्यालयापर्यंत पोहचू नये याची पुरेपूर काळजी घेत कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाला आज सुरूवात झाल्यानंतर पोलिसांनी हा मोर्चा अडविला आहे. दरम्यान, पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी गनिमी कावा करून शिवसैनिक कार्यालय उद्धवस्त करतीलच, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.









