
नागपूर- बाजारात मिळणारे लिंबू पाणी, उसाचा रस, विविध फळांचे रस यांचे सर्वसामान्य ग्राहकांच्या लेखी असलेले महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अशा अस्सल भारतीय पेयांची जागा आता शीतपेयांनी घेतली आहे. शीतपेयांमध्येही पूर्वी केवळ पेप्सी, थम्स आणि कोका कोला हेच ब्रॅण्ड्स बाजारात होते. आता मात्र या बाजारात अस्सल सोडा व काहीसा गोडपणा असलेल्या ड्यू, स्प्राइडसारखी शीतपेयेदेखील दाखल झाली आहेत. आधी केवळ महानगरापुरता मर्यादीत असलेला शीतपेयांचा हा बाजार आता नागपूरसारख्या द्वितीय श्रेणी एवढेच नाही, तर ग्रामीण भागातही जलदगतीने वाढतो आहे. एकीकडे या विदेशी शीतपेयांच्या वाढत असलेल्या बाजाराची भीती भारतीय उत्पादनांना आहेच. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे या शीतपेयांमधील अत्यंत गोड असलेला सोडा. हा सोडा लठ्ठपणा व पर्यायाने मधुमेह वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याने यापासून सावधान राहण्याची गरज आहे.
भारतातील मधुमेह रुग्ण व लठ्ठपणाच्या तक्रारी झपाट्याने वाढत आहेत. याच्या नेमक्या कारणांचा आढावा ‘ग्राहकदृष्टी’ या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या मासिकाने घेतला. त्यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार शीतपेयांमधील सोड्यात असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे लठ्ठपणा वाढवत असल्याचे दिसून आले आहे. यानुसार संघटनेच्या चमूने अन्न व औषधे प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर सोड्यातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाची केंद्र सरकारनेदेखील गंभीर दखल घेतली आहे.
पेप्सीको कंपनीच्या अध्यक्ष इंद्रा नुयी यांनी अलीकडेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांची भेट घेतली. त्यामध्ये पेप्सी कंपनी भारतात आरोग्यवर्धक पेय आणत असल्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, देशातील ग्राहकरुपी नागरिकांच्या आरोग्याची काळजी असल्याने पेप्सी कंपनीने आधी सोड्यातील साखरेचे प्रमाण कमी करावे. त्यादृष्टीने हालचाल सुरू करावी, अशी स्पष्ट सुचना बादल यांच्याकडून नुयी यांना देण्यात आली.
आज मुंबईसारखी महानगरे असो वा पुणे-नागपूरसारखी द्वितीय श्रेणी शहरे. भारतातील बहुतांश कुटुंबांचे आठवड्यातील एक जेवण हे बाहेर हॉटेलमध्ये असते. यासोबत अन्य दिवशीदेखील ते फास्ट फूडलाच जवळ करतात. कॉलेजमधील तरुणाई जवळपास रोजच फास्ट फूडचा आधार घेते. या प्रत्येक फास्ट फूडसोबत सहजच शीतपेयांचे सेवन केले जाते. मात्र, शीतपेय पोटात ढकलताना त्यामधील सोड्यातील भरमसाठ साखरेचा विचार केला जात नाही. यातून लठ्ठपणा व परिणामी मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच सजग होऊन पारंपरिक भारतीय रस व ज्युसला जवळ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









