
थिम्पू – भारत शेजारधर्म पाळण्यासाठी कटिबध्द असून, सत्तांतर झाले तरी, त्याचा भारत-भूतान संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध ठेवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानच्या संसदेला दिला. दोन दिवसाच्या भूतान दौ-यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी सोमवारी भूतानच्या संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना हे विचार व्यक्त केले.
भारताने प्रगती केली तर, शेजारी देशांच्या विकासालाही चालना मिळेल. भारतात स्थिरता आणि विकास झाला तर, भूतानलाही त्याचा फायदा होईल असे मोदींनी सांगितले. मोदींनी हिंदीमधुन भूतानच्या संसदेला संबोधित केले. भूतानच्या राजेशाहीकडून लोकशाहीकडे झालेल्या प्रवासाबद्दल मोदींनी भूतानचे कौतुक केले. गेल्या सातवर्षात भूतानचा राजेशाहीकडून लोकशाहीकडे ज्या सहजतेने प्रवास झाला आहे. त्यातून राज्यकारभारातील परिपक्वता दिसून येते असे मोदी म्हणाले. भारताच्या भूतान बरोबरच्या ऐतिहासिक संबंधांचा दाखला देताना, मोदींनी आपले सरकार भूतानबरोबरचे संबंध अधिक सृदृढ करण्यासाठी काम करेल अशी ग्वाही यावेळी दिली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परदेश दौ-यासाठी भूतानची निवड करण्यामागेही अनेक कारणे आहेत. सामरिक दृष्टया भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. गेल्या काही काळापासून चीनची भूतानबरोबर जवळीक वाढली आहे तसेच भारत विरोधात दहशतवादी कारवायांसाठीही भूतानच्या भूमीचा उपयोग होत आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नरेंद्र मोदी यांचा भूतान दौरा महत्वाचा होता.









