जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु
यवतमाळ, दि. 1 : कालपासून जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरु आहे. ठिकठिकाणी या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण विहित वेळेत पुर्ण करण्याचे सुचना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी संबंधीत सर्व अधिकारी व विभागांना केल्या आहे.
आज सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात 53.8, बाभुळगाव 40, दिग्रस 31, नेर 29, आर्णी 28, उमरखेड 21, पांढरकवडा 18.5, राळेगाव 18 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. अन्य तालुक्यातसुध्दा थोड्या प्रमाणात पावसाची नोंद आहे. काल झालेल्या पावसामुळे बिटरगाव येथील पांडुरंग मल्हारी चिकणे या व्यक्तीचा विज पडून मृत्यु झाला. त्यांची मुले मनोज व विशाल ही विजेमुळे जखमी झाली असून त्यांच्यावर ढाणकी येथे उपचार सुरु आहे. उमरखेड तालुक्यातीलच पिंपळगाव येथील शंकर सुर्यभान मालतकर यांच्या मालकीची म्हैस विज पडल्याने मरण पावली.
ठिकठिकाणी झालेल्या या नुकसानीची सर्वेक्षण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधीत विभागांना केल्या आहे. या सर्वेक्षणातून शेतीपीके, पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान तसेच जनावरांच्या गोठ्याचे नुकसान सर्वेक्षणातून सुटु नये अशा सुचनाही करण्यात आल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले हे या कक्षाचे प्रमुख आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप, सहकारी एकनाथ बिजवे, यु.ए.जुमडे, मंगेश सुळके, नितीन मांडेकर, नितीन पाटकुरवार हे या कक्षात कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 255077, 240720 व टोल फ्री क्रमांक 1077 अशा आहे. जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्यास या क्रमांकावर माहिती कळवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीमुळे खचुन जावू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.










