
शिवसेनेकडून दारव्हा येथे ६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खताचे वाटप
यवतमाळ, दि. १८ – समाजाभिमूख आणि सकारात्मक आंदोलनांपासून शिवसेना कधीही दूर जाणार नाही, अशी ग्वाही देत शेतकरी हितासाठी शिवसेनेचे उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे, हेच शिवसेनेचे पूर्वीपासूनचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. दारव्हा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबिंयांना मोफत बियाणे व खत वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. रावते म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहे. अनेक ठिकाणी पेरणी उलटली, पावसाअभावी पिके करपत आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा स्थितीत आपल्या पाठीमागे कोणाचीतरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे, आणि ‘पेरते व्हा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्या सोबत आहे, हेच सांगायला मी आज येथे आलो आहे, असे ते म्हणाले. प्रथम शेतकरी हित ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पक्षनेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करू नका एवढीच कळकळीची विनंती मी शेतकऱ्यांना करतो, अशी भावनिक सादही ना. रावते यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली.
याप्रंसगी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी, जिल्ह्यात १ जुलैपासून शिवसेनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेतीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० च्या वर शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी पेरणी करून दिली आहे. शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हाही, आणि आता सत्तेत असतानाही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र संकटकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडून कुटुंबाला उघड्यावर पाडू नये, असे आवाहन ना. संजय राठोड यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील ६५० शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर बियाण्यांचे व एसएसपी खताचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड यांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप केले. शिवसेनेतर्फे सर्व शेतकऱ्यांच्या घरी हे बियाणे पोहचवून देण्यात आले. कार्यक्रमात तूर, सोयाबीन व खताच्या प्रत्येकी ६५० बॅग वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातीर, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडीत राठोड, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जि.प.सदस्य संगीता इंगोले, पं.स.सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडीच्या जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी शिवसेना पदाधिकारी, शेकडो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय गाडगे यांनी केले.









