

नागपूर दि. ११ (विशेष प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७ हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी ‘खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे’, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकशानुसार मदत देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी किमान ४ हजार ५०० रुपयांची मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाच लाख शेतकऱ्यांची सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्तता करण्याची तसेच मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांची वीज बिल माफी देण्याची हमी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफीने बँकांमधील कर्ज माफ झाले तरी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम राहत होते. त्या तणावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारांकडून घेतलेले कर्ज स्वत: फेडण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून केंद्राकडे यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे.









