
भिवानी – बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-याला मदत करण्याची जबाबदारी केंद्रात आणि हरयाणात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारची आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. आज आपला अन्नदाता संकटात सापडला आहे.
शेतक-यांची सध्याची अवस्था पाहता त्याला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधींनी शनिवारी हरयाणाचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थिती समजून घेतली. काँग्रेसने सध्या शेतक-यांच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकालाही काँग्रेसने जोरदार विरोध केला असून, संसदीय मार्गाने आणि रस्त्यावर या विधेयकाविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे. या विधेयकाविरोधात सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत.









