
नवी दिल्ली- देशाच्या विविध भागांत दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी जोरदार मागणी सर्व पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गारपीटही झाली. यामुळे गहू, तांदूळ, डाळी, तूर, मूग आदी पिके नष्ट झाली आहेत. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सर्व पक्षांच्या खासदारांनी केली.
लोकसभेतील शून्य तासांच्या प्रश्नावर भाजपाचे खासदार ओम बिर्ला म्हणाले की, अवकाळी पावसाने राजस्थानातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तर काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुडा यांनी हरयाणातील शेतक-यांची बिकट परिस्थितीची माहिती दिली. शेतक-यांना युरियाचा तुटवडा जाणवत असून खरीप पिकांना चांगली किंमत मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, अवकाळी पावसाने झालेले नुकसान पाहून उत्तर प्रदेशात तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
महाराष्ट्राचे एक हजार कोटींचे नुकसानराज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली.









