
ढाणकी ,दि. १२ – टेभेश्वरनगर येथे नाली बांधकामासह अन्य समस्या निकाली काढाव्या या मागणीसाठी तेथील नागरिकांनी ढाणकी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीन तास ठिय्या मांडला.
टेभेश्वर नगर हे ढाणकी ग्रामपंचायतमध्ये येत असून ग्रामपंचायत प्रशासनाला १८ नोव्हेंबर २०१४ रोजी नागरिकांनी निवदन दिले होते. त्यामध्ये नाली बांधकाम, कचरा सफाई, रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी केली होती. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने आंदोलकांना मागण्या ३० डिसेंबर पर्यंत निकाली काढणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु दोन महीने होऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान आज संतप्त टेभेश्वर नगर वासीयांनी ढाणकी ग्रामपंचायतवर धडक दिली. सरपंच, सचिवांनी जनतेची दिशाभूल केली असून त्याच्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीन तास ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड शहर प्रमुख विजय धोपटे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड यांनी केले. या आंदोलनात सय्यद अजिम, देवराव शेळके, साहेबराव धोपटे, मुन्ना भंडारे, माधव बाठोरे, शे. इसराईल, लतीम यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.









