
नवी दिल्ली – भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि शैलीदार फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण लवकरच आपल्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सल्लागाराच्या नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
भारतात क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआयने तयार केलेल्या उच्चस्तरीय सल्लागार समितीमध्ये या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही जण बीसीसीआयला क्रिकेटशी संबंधित विषयामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. बीसीसीआय अध्यक्ष जनमोहन दालमिया आणि अनुराग ठाकूर या त्रिसदस्यीय समितीशी चर्चा केल्यानंतरच भारतीय क्रिकेटशी संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सौरव गांगुलीला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाईल अशी जोरदार चर्चा होती. मात्र गांगुलीचा सल्लागार समितीमध्ये समावेश झाल्याने, रवी शास्त्री संघ संचालकपदावर कायम रहातील अशी शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक नियुक्त करताना तसेच देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा सुधारण्यामध्ये या समितीची भूमिका महत्वाची असेल. संघ आणि बोर्डामध्ये ही समिती समन्वय ठेवण्याचेही काम करेल.









