
मुंबई- मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या २००७ ते २०१४ या सात वर्षाच्या कालावधीत २५९ पोलिसांनी आत्महत्या केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
ज्या पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत, या आत्महत्या या पोलिसांनी विविध कार्यक्रम सण, उत्सव आदी कारणांमुळे आणि सतत वेळी-अवेळी बंदोबस्ताचे काम दिल्यामुळे झाल्या आहेत, असे म्हणता येणार नाही. सदर आत्महत्या होण्यामागे कौटुंबिक तसेच वेगवेगळी वैयक्तिक कारणे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील पोलिसांना २४ तास काम करावे लागत आहे. यामुळे पोलिसांमध्ये दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तसेच कामाचा ताण वाढत असल्याने मागील वर्षात १४७हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला.
हा प्रकार खरा आहे काय, असा सवाल विचारला होता. तसेच कायम बंदोबस्त, अपुरी झोप, वरिष्ठांकडून दिली जाणारी जाचक वागणूक या असह्य ताणामुळे २००७ ते २०१४ या कालावधीमध्ये २४७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जानेवारी २०१५ मध्ये गृहविभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे काय, असाही सवाल आमदार राणे यांनी उपस्थित केला होता.
आमदार राणे यांच्या तारांकित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ज्या १४७ पोलिसांचे विविध आजारांनी निधन झाले आहे, त्यांचे निधन कामाच्या तणावामुळे झाल्याच्या नोंदी अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा स्पष्ट दावा आपल्या उत्तरात केला. तर पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे, तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना राबविण्यात येत असून बीएमआय चाचणी करून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. तर पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्मचारी वृंद परिषदेचे आयोजन करण्यात येते. तसेच आज्ञांकित कक्ष व दरबारामध्ये त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले आहे. पोलीस, पोलीस अधिकारी यांच्यासाठी तणावमुक्त व निरोगी राहण्यासाठी आरोग्यविषयक तपासणी शिबिर कार्यशाळा, योगा, आरोग्यविषयक जागरूकता शिबिरांचे आयोजनही करण्यात येते.









