
नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अखेर आपले मौन सोडले. साध्वी यांचे हे विधान पूर्णपणे निषेधार्ह असून अशा प्रकारची विधाने करणे टाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सभेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकऱणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून साध्वी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी विरोधकांनी बुधवारी केली होती. यावर गुरुवारी पंतप्रधानांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. साध्वी यांनी केलेले हे विधान पूर्णपणे निषेधार्ह आहे. नेत्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. याप्रकरणी साध्वी यांनी माफी मागितली आहे त्यामुळे ही माफी स्वीकारुन संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे अशी विनंती मोदी यांनी केली.तसेच साध्वी या नवीन आहेत. त्यांनी याप्रकऱणी माफी मागितली आहे त्यामुळे हे प्रकऱण इथेच संपवावे असे त्यांनी सांगितले.









