यवतमाळ दि.21: अलिकडे युवकांमध्ये नकारात्मकता वाढत चालली आहे. युवा पिढी अशा विचारांमध्ये लोटल्या गेल्यास प्रगतीला खिळ बसेल. कोणत्याही क्षेत्रात चांगली प्रगती साधण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. त्यामुळे युवकांमधील नकारात्मकता काढण्याचे काम साहित्याने करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आर्णी येथे आयोजित 63 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवतळे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी तथा 63 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर बडे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, संपादक तथा जेष्ठ साहित्यिक सुरेश व्दादशिवार, जेष्ठ कवी विठ्ठल वाघ, 62 व्या संमेलनाचे
अध्यक्ष किशोर सानप, श्रीपाद भालचंद्र जोशी, रमाकांत कोलते, रवींद्र शोभणे, दिलीप एडकर, कलीम खान, शंकरराव सांगळे, डॉ.संजय भारती आदी उपस्थित होते. राज्यात यशवंतराव चव्हाणांनी सांस्कृतिक चळवळ सुरु केली. नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी ती वाढविली. शासन साहित्य चळवळीला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. साहित्य प्रेरणा देणारे आहे. साहित्यिकांनी ज्ञान, विज्ञान तसेच इतर महत्वांच्या बाबींमध्ये होणाऱ्या बदलांची दखल घेणे आवश्यक आहे. साहित्याच्या प्रकाशातूनच कौशल्य वाढीस लागते. त्यामुळे युवकांच्या हातात साहित्य देतांना त्यांची मानसिकता बदलविणारे साहित्य असले पाहिजे. परिश्रमाशिवाय पर्याय नाही, ही बाब साहित्याने युवकांच्या लक्षात आणुन दिली पाहिजे. प्रयत्नानेच यशस्वी होवू शकतो, ही बाब पटवून देण्यासोबतच साहित्याने युवकांमध्ये स्वप्नांची बिजे रोवली पाहिजे, असे .देवतळे साहित्य तसेच नाटकांमध्ये सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे. महाराष्ट्र साहित्य, कलावंतांची खाण आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन दुर्मिळ ग्रंथांची जपवणूक करण्यासाठी अशा सर्व ग्रंथांचे डिजीटायझेशन करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपले स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी साहित्यात परिवर्तन घडविण्याची शक्ती आहे, असे सांगितले. लेखनीत प्रचंड ताकद आहे. साहित्यिकांनी प्रभावी साहित्य केल्यास व्यसनमुक्ती होवू शकते. मानव कल्यानाचे काम साहित्य करीत असते, असे ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्ष शंकर बडे यांनी यावेळी विविध विषयांवर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रकाश टाकला. जगण्याशी प्रामाणिक असले तरच साहित्यिक, कवींच्या शब्दामध्ये जोर येतो. आपण आयुष्यभर मानसे वाचण्याचेच काम केले. त्यामुळे माझ्या कवितेत वास्तविकता आहे. आयुष्यासोबत कविता होत गेली. जगण्याचेखरेपण कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केल्याचेअध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले. जेष्ठ साहित्यिक सुरेश व्दादशिवार, 62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किशोर सानप यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी काही पुस्तकांचे प्रकाशनही झाले. त्यात प्राचार्य प्रभाकर कामतकर लिखीत जटायु हा कथासंग्रह, सुमन मनवर लिखीत संदेश हा व्यसंग्रह, विशेष पवार लिखीत गितांजलीचे बंजारी भाषेत अनुवाद झालेले विशेष गितांजली या पुस्तकासोबतचे सुनिल जयस्वाल यांच्या पाऊलखुना या व्हिडिओ सीडीच्या प्रकाशनाचा समावेश होता. उद्घाटन समारंभाला साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.









