
मुंबई, दि. १० ( प्रतिनिधी) – संत – योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही ‘बिनधास्त’ लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंब-या गाजल्या होत्या.
मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लिखाण करणारे चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एमए झाल्यावर त्यांनी पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणा-या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएचडी करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. ‘अबकडइ’ हे दिवाळी अंकानेही वाचकांवर गारुड घातले होते. बोल्ड विषयांवर कादंबरी लिहील्यानंतर खोत हे अध्यात्मिक साहित्याकडे वळले. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील सातरस्ता येथील साईबाबा मंदिरात राहत होते. बुधवारी पहाटे वृद्धापकाळामुळे खोत यांचे निधन झाले. खोत यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातील बंडखोर लेखक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.









