

नागपूर – ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना दहा वर्षांतील कारभाराबद्दल का विचारत नाहीत? त्यांनाही हिशेब विचारा ना, असे आव्हान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी येथे ‘आप’ला दिले.
‘फ्रेण्ड्स ऑफ बीजेपी’च्यावतीने ‘व्हिजन ऑफ बीजेपी फॉर डेव्हलप्ड इंडिया’ या विषयावर शंकरनगरातील साई सभागृहात संवाद आयोजित करण्यात आला होता. भाजपचे नितीन गडकरी यांच्या प्रचारानिमित्त नागपूरकरांशी संवाद साधताना पर्रिकर यांनी सहज शैलीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे गुणगान करून गोव्याच्या विकासाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. पक्षाची लहान राज्यांची भूमिका असल्याचे सांगत वेगळ्या विदर्भाचे समर्थन करताना त्यांनी सावध पवित्रा घेतला. ‘अरविंद केजरीवाल यांनी आघाडी उघडताच माझी अचानक किंमत वाढली. देशभरातून आमंत्रणे येऊ लागली’, असे सांगून मनोहर पर्रीकर यांनी केजरीवाल यांचे उपरोधिक आभार मानले व त्यांच्या साधेपणावर टोले लगावले. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. साधेपणासोबत एखादी बाब घडवणे व तिची योग्य अंमलबजावणी करण्याची क्षमता आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या माणसाची गरज आहे. सद्यस्थितीत नरेंद्र मोदी सोडल्यास कुणीही अशी क्षमतावान व्यक्ती नाही, असा दावाही पर्रिकर यांनी केला. आयआयटीयन्सचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना त्यांनी एक किस्साही सांगितला. १८ वर्षांपासून राजकारणात असलो तरी, अद्याप राजकारणी झालो नाही, असे पर्रिकर म्हणाले. यानंतर त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपच्या कोषाध्यक्ष शायना एन.सी. मॉडरेटर होत्या. ‘वेद’चे देवेंद्र पारेख, नाग-विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, रमेश मंत्री आदी उपस्थित होते. संचालन नितीन रोंघे यांनी केले.









