
नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. येत्या १२ मे रोजी सोमवारी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात तीन राज्यातील ४१ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
अंतिम टप्प्यात वाराणसीची लढत सर्वात लक्षवेधी लढत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येथून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान आहे.
विकासाच्या मुद्यावरुन सरु झालेला प्रचार शेवटच्या टप्प्यांमध्ये जाती-पातीच्या पातळीपर्यंत घसरला. भाजप नेते गिरीराज सिंह, अमित शहा, सपाचे नेते मुलायमसिंह यादव, आझम खान आणि अबू आझमी यांनी जाहीरसभांमधुन वादग्रस्त विधाने केली. अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यातील शाब्दीक व्दंद चांगलेच रंगले. अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेशातील १८, पश्चिम बंगालमधील १७ आणि बिहारमधील सहा जागांवर मतदान होणार आहे. १६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदाच्या मतदानाने १९८४ च्या मतदानाचा विक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत झालेल्या आठ टप्प्यांमध्ये ५०२ लोकसभा मतदारसंघात ६६.२७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २००९ मध्ये संपूर्ण देशात एकूण ५७.९४ टक्के मतदान झाले होते. यावेळी २००९ च्या तुलनेत प्रत्येक टप्प्यामध्ये मतदानात वाढ झाली आहे.









