
नवी दिल्ली – देशाचे राजकारण हलवून सोडणा-या हाशीमपूर हत्याकांड प्रकरणात २८ वर्षानंतर निकाल आला असून, दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्याअभावी १६ आरोपींची सुटका केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय जिंदाल यांनी उत्तर प्रदेश पोलिस दलातील पीएसीच्या १६ जवानांची हत्येच्या आरोपातून सुटका केली. हाशीमपूर हत्याकांडात ४० हून अधिक मुस्लिमांची हत्या झाली होती.
१९८७ साली मेरठ शहरात दंगल उसळलेली असताना शोध मोहिमे दरम्यान पीएसीच्या जवानांनी हाशीमपूरयेथून मुस्लिमांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी १९९६ साली गाझियाबादच्या मुख्य न्याय दंडाधिका-यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कुटुंबियांनी निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २००२ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी दिल्ली तीस हजारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. १९ आरोपींपैकी तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला.









