यवतमाळ, दि. ५ : होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी होळीमध्ये लाकडांचा वापर करण्याऐवजी वृक्षपूजनाने होळी साजरी करण्याचा संदेश राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिला.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गार्डन हॉलसमोरील बगीच्यात होळी निमित्त आज गुरूवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी डॉ. राजेश अडपावार, तहसीलदार अनुप खांडे, नायब तहसीलदार दिलीप झाडे, दिलीप कडासने, अजय शेटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
होळीत लाकडे जाळल्याने पर्यावरणाचा र्हास होतो. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे असून होळीसारख्या सणांना नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्षपूजन केले पाहिजे, असे ना. संजय राठोड म्हणाले. त्याचप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याऐवजी कोरडे गुलालाचे रंग वापरून धुळवड साजरी करण्याचे आवाहन याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केले.










