११ हजार उमेदवारांनी दिली परिचरपदाची परीक्षा

2014-11-05exmp_ns
यवतमाळ, दि. ४ – जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिचरपदाच्या लेखी परीक्षेचा पेपर ११ हजार उमेदवारांनी सोडविला. जिल्ह्यातील ९० केंद्रावर दुपारी २ ते ३.३० वाजताच्या दरम्यान ही परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यापूर्वी पेपर फुटल्यामुळे आजच्या परीक्षेकडे तब्बल सात हजार उमेदवारांनी पाठ फिरविली. यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी परिचरपदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र विस्तार अधिकाºयाने पेपर फोडल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवली होती. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्यात येत असल्याने प्रशासनावर कमालीचा ताण आला होता. या परीक्षेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. परिचरपदाच्या ४५ जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ११ हजार २६४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तब्बल ६ हजार ८८९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. पेपर फुटीमुळे उमेदवारांनी परीक्षेला गैरहजर राहने पसंत केल्याचे सांगण्यात येते. उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ४० च्या घरात आहे. बंदुकधारी पोलीस व संपर्क अधिकारी यांच्या सुरक्षेत पेपर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात आले. यवतमाळ शहरात ४३ परीक्षा केंद्र होते. तर कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर तालुक्यात ४७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 81