१६२ लोकांना अन्नातून विषबाधा

भंडारा – पवनी तालुक्यातील मोहरी येथे स्वागत समारंभादरम्यान गावातील १६२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सर्व रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव व ग्रामीण रुग्णालय पवनी येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
मोहरी येथील माधव कोरे यांचा मुलगा नितेश कोरे याचे ३० मार्च रोजी नागभिड तालुक्यातील बोथली येथे लग्न होते. लग्नानंतर ३१ मार्च रोजी स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांसह कोरे यांच्या घरी असलेल्या पाहुण्यांनी रात्रीचे जेवण आटोपले. जेवण आटोपल्यानंतर गावातील लोक आपआपल्या घरी परतले. दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांना हगवण, उलटीचा त्रास सुरू झाला. १६२ रुग्णांना तात्काळ आसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात लोकेश कोरे, लक्ष्मण कोरे, ताराचंद कोरे, नितेश कोरे, कल्पना कोरे, नुतन कोरे, सुरेखा कोरे, पंडीत कांबळे, चंद्रहास ब्राह्मणकर, सुनंदा ब्राह्मणकर, प्रणय ब्राह्मणकर, हिरामण कोरे, रसिका कोरे, दुर्योधन कोरे यांच्यासह १७ रुग्णांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे. परंतु अद्यापही गावातील नागरिकांना हगवण व उलटी सुरूच असून रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = three