
नागपूर – येत्या १ ऑगस्ट २०१५ ला एलबीटी हटविणार तसेच एलबीटी आंदोलनादरम्यान ज्या व्यापाऱ्यांवर नोव्हेंबर २०१४ पर्यंत दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपुरात नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
फ्रान्स आणि जर्मनीच्या दौऱ्यात तेथील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असल्याचंही फडणवीसांनी सांगितले. त्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली असून नागपुरात गुंतवणूक करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भात कृषी आधारित उद्योग सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या कृषीमालावर उत्पादन करणाऱ्या कंपनीने रशियाच्या कंपनीबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. नागपूर जी. एस. टीचे केंद्र बनेल. विविध प्रकारच्या कंपन्या विदर्भात येणार आहेत. ५ लाख शेतकऱ्यांकडून सरळ माल विकत घेतली. शेतकऱ्यांची ही संख्या २५ लाखांपर्यंत वाढेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.









