
नागपूर – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ५४३.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तांमार्फत नुकसानीचा हा अहवाल कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पाठविण्यात येणार आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने पिके मातीमोल झाली आहेत. सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात ४३ हजार ५२६ हेक्टरवर नुकसान झाल्याचा वर्तविण्यात आला होता. गाव, तालुका आणि उपविभागीय स्तरावर समित्या नेमून सर्वेक्षण केल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र १ लाख ६ हजार आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ३२ हजार २०३.१२ हेक्टर आहे. या अहवालावर प्रकाश टाकल्यास जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात म्हणजे १४ हजार ८९७ हेक्टरवर झाल्याचे पुढे येते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १३ मार्च रोजी केंद्राची चमू येणार आहे. एका दिवसात नुकसानग्रस्त भागाचा आढावा ही समिती घेणार आहे. त्यानंतर आपला अहवाल केंद्रसरकारच्या कृषी विभागाला सादर करून नुकसानग्रस्तांसाठी केंद्राचीही मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.









