
मुंबई – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पुढल्यावर्षी होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य तीस सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे अनुभवी पण सध्या खराब कामगिरीमुळे संघाबाहेर असलेल्या चार खेळाडूंना ३० जणांच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या संघात एकवेळचे भारतीय संघाचे आधारस्तंभ समजले जाणारे विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना स्थान मिळालेले नाही. या पाच ही खेळाडूंना गेल्या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याचा निवड समितीने विचार केलेला नाही.
संभाव्य संघात आशिष नेहरा, पियुष चावला यांना स्थान मिळाले आहे. तर जम्मू काश्मीरकडून खेळणारा अष्टपैलू परवेझ रसूल, उत्तर प्रदेशचा कुलदीप यादव, मनिष पांडे,केदार जाधव, अक्सर पटेल यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या ३०मध्ये स्थान मिळवले आहे.
या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ३० जणांमध्ये २०११मध्ये झालेल्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची संख्या अगदी कमी आहे. युवराज, सेहवाग, हरभजन, गंभीर आणि झहीर हे खराब कामगिरीमुळे बाहेर आहेत. तर अन्य खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर याने निवृत्ती घेतली आहे. आणि एस.श्रीसंत यावर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली आहे.पुढील वर्षी १४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.









