२०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

images
केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांची लेखी उत्तरात कबुली
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –  सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात जानेवारी ते एप्रिल २०१४ या चार महिन्यात तब्बल २०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक कबुली, केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलायन यांनी दिली आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला त्यांनी लिखित स्वरूपात हे उत्तर दिले आहे.
याच लेखी उत्तरात डॉ. बलायन यांनी देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारीसुद्धा सादर केली आहे. महाराष्ट्राची आकडेवारी एप्रिलपर्यंतची आहे. अन्य राज्यांतील आकडेवारी मात्र ऑक्टोबरपर्यंतची दिलीय. एप्रिलनंतर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून विदर्भासह मराठवाड्यातही शेतकरी आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत.
शेती आणि शेतीवरील कर्ज हा राज्य सरकारशी संबंधित विषय असला तरी या क्षेत्राच्या विकासासाठी शक्य ती सर्व मदत केंद्र सरकार करत असते. या मदतीत आर्थिक तसेच धोरणात्मक उपाययोजनांचा समावेश असतो, असे डॉ. बलायन यांनी सांगितले. तेलंगण राज्यात यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत ६९, कर्नाटकमध्ये ऑक्टोबरपर्यंत १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. देशभर राबवण्यात येणाऱ्या कृषी विषयाशी निगडित योजना आणि कार्यक्रमांसाठी २२ हजार ३०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही डॉ. बलायन यांनी या उत्तरात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = nine