
नवी दिल्ली – तब्बल २१ वर्षानंतर सियाचीन ग्लेशिअरमध्ये मरण पावलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह सापडला आहे. तुकाराम पाटील असे या मृत जवानाचे नाव असून, ते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सियाचीन ही जगातील सर्वात उंच युध्दभूमी आहे.
फेब्रुवारी १९९३ मध्ये तुकाराम पाटील सियाचीनमधील एका हिमदरीत पडले होते. हवाईमार्गे मिळणारी मदत स्वीकारत असताना, ते मार्ग भरकटून एका हिमदरीत पडले. यावेळी त्यांच्यासोबत असणा-या जवानांनी त्यांना हाताला धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र हातातील बर्फाचे ग्लोव्हज निसटले आणि पाटील कित्येक फूट खोल दरीत पडले. यानंतर त्यांचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
मागच्या रविवारी लष्कराचे जवान गस्त घालत असताना, त्यांना तुकाराम पाटील यांचा गोठलेला मृतदेह सापडला. महत्वाचे म्हणजे अत्यंत थंड वातावरणामुळे तुकाराम पाटील यांचा मृतदेह खराब झालेला नाही. त्यांच्या खिशातील पत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन त्यांची ओळख पटली. त्यांच्या भावाचाही १९८७ मध्ये सियाचीनमध्ये तैनात असताना मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही.









