
यवतमाळ, दि. २० – इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होणार असून, टर्निंग पॉर्इंट ठरणाºया परीक्षेला जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहे. एकूण ९९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. चिटोरेबहाद्दरांना रोखण्यासाठी यंदाही कॉपीमुक्त अभियान राहणार आहे. त्यासाठी १५६ बैठे पथकांसह सात भरारी पथकाचा वॉच राहणार आहे.
करिअर कशात करायचे, यासाठी बारावीची परीक्षा महत्वाची ठरते. मायमराठीच्या पेपरने सुरू होणारी परीक्षा २२ हजार विद्यार्थी देणार आहे. गैरमार्गाशी लढा उपक्रमातंर्गत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार आढळल्यास केंद्रप्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीपासून तर संपेपर्यंत प्रत्येक केंद्रावर बैठे पथकाचा ठिय्या राहणार आहे. त्यासाठी १५६ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच सात भरारी पथकही राहणार आहे. ही पथके अकस्मात कुठल्याही परीक्षा केंद्रावर भेट देऊ शकतात. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. कॉपी आढळल्यास केंद्र प्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांच्यावर कारवाईची कुºहाड कोसळणार असून, शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आल्याने संस्थाचालकांचे धाबे आतापासूनच दणाणले आहे.









