
सोलापूर – जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्यांपैकी २० ते २२ मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळते आहे.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज सकाळी साडे नऊच्या सुमारास विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजने अंतर्गत पुरण्यात येणारी खिचडी देण्यात आली. त्यानंतर अनेकांना मळमळ, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे सगळेच विद्यार्थी पोट दु:खी आणि मळमळ झाल्याची तक्रार करू लागले. या विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या २० ते २० मुलांची प्रकृती खालावली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून अन्न पदार्थांचे नमूने प्रशासनाकडून गोळा करण्यात आले आहेत. तपाणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.









