३ अपघातात २० ठार, २४ जखमी

10
पालघर/पुणे/नांदेड – आठवड्याचा पहिलाच दिवस राज्यात झालेल्या तीन भीषण अपघातांनी घातवार ठरत आहे. तीन अपघातात २० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. पहिल्या दुर्घटनेत बारामती तालुक्यातील तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या स्कॉर्पिओला आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे अपघात होऊन यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास झाला. दुसऱ्या एका घटनेत आज सकाळी पावणेचारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन बसमध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी ठार झाले तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे.जखमींना मुंबई आणि गुजरातमधील वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यात स्विप्ट कारला भरधाव डंपरने धडक दिल्याने बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बारामती तालुक्यातील तिरुपती भक्तांचा आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे झालेल्या अपघातात ७ युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, शेखर बापूराव गवळी, ऋषिकेश पोपट गवळी, मोहन दत्तात्रय गवळी आदी सामिल आहेत. हे सर्वजण बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ आणि उंडवडी सुपे येथील रहिवासी आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये गुजरातमधील नडीयाद येथून एक खासगी आरामबस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असताना तलासरीजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या एका मिनी बसने या आराम बसला जोराची धडक दिली. डिव्हायडर तोडून ही बस आरामबसवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसमधील ११ प्रवासी जागीच ठार झाले. तर २० जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
भरधाव डंपरने धडकेत कारमधील दोघेजण ठार, तर चार जण गंभीर
नांदेड – भरधाव वेगात असणाऱ्या टिप्परने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री लोह्याजवळील सुनेगाव टाळावा येथे हा भीषण अपघात झाला.
या अपघातात कारमधील राजेंद्र कानगावकर (वय ४७), वच्छला कानगावकर हे दोघेजण जागीच ठार झाले. तर वैशाली कानगावकर, साधना कानगावकर, समर्थ कानगावकर व कारचालक गंभीर जखमी झाले आहेत.
उमरी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून कानगावकर कुटुंबीय स्विफ्ट डिझायर कारने (एम एच ४४ जी १६८४) परळीकडे परतत होते. लोह्याच्या शिवाजी चौकातून गंगाखेड मार्गाकडे वळाल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनेगाव तलावालगत समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने (एम एच २६ ३४१) कारला समोरून धडक दिली. घटनेनंतर टिपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one + 3 =