
यवतमाळ, दि. २ – महाराष्टÑ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. १४८ केंद्रावर ४३ हजार ६३८ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने उद्यापासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले आहे. ३९ हजार ९१० विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार असून, ३ हजार ७२८ विद्यार्थी रिपीटर आहे. १४८ केंद्रावर कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी १५६ बैठे पथक व सात भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गणित, इंग्रजी, सायन्सच्या पेपरला केंद्रावर व्हीडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आजही अनेक केंद्रावर कॉपीचा वापर खुलेआम होत आहे. अशा उपद्रवी केंद्रावर बोर्डाची विशेष नजर राहणार असून, त्यासाठी बोर्डाने पथक कार्यान्वित केले आहे. उद्या मराठीचा पेपर असून, विद्यार्थ्यांना दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.









