९६ टक्के यवतमाळकरांनी दिला वेगळ्या विदर्भालाच कौल

यवतमाळ – ‘वेगळा विदर्भ असावा की नसावा’ यासाठी यवतमाळमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ९६ टक्के यवतमाळकरांनी वेगळ्या विदर्भालाच कौल दिला. केवळ दोन टक्के मतदारांनी ‘वेगळे राज्य नको’ असे मत नोंदविले. या निकालाने विदर्भवाद्यांचा उत्साह दुणावला असून अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि आता यवतमाळकरांनीही आपला कौल विदर्भाच्या बाजूने दिला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य रमाकांत कोलते यांच्या नेतृत्वात मत मोजणी प्रक्रिया पार पडली. या मत मोजणी प्रक्रियेत दोन टक्के मते अवैध ठरली. अवैध मतदानामध्ये अनेकांनी दोन्हीवर आपले मत नोंदवून तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सकाळी ९ वाजेपासून येथील टिम्बर भवच्या परिसरात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीची यंत्रणा समाज कल्याण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली होती. जनमताचा कौल ऐकण्यासाठी शेकडो नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने ९६ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे जाहीर होताचा विदर्भ समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विदर्भाच्या बाजूने मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल जांबुवंतराव धोटे यांनी आनंद व्यक्त केला. आता तरी शासनाने जनतेच्या मागणीचा विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. विदर्भवादी जनतेचा अंत पाहू नये. तेलंगणा राज्याच्या आधिपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे. आज तेलंगणा स्वतंत्र होत आहे तर दुसरीकडे विदर्भबाबत विचार करण्यास ही राज्यकर्ते तयार नाहीत हे चुकीचे असल्याची खंत धोटे यांनी व्यक्त केली. यावेळी विदर्भ जॉइन्ट अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष दीपक निलावार म्हणाले की, यवतमाळकरांनी विदर्भाच्याच बाजूने आपले मत नोंदवलेले आहे. यावरून जनतेमध्ये असणारा असंतोष दिसून येत आहे. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात ही जनमत चाचणी होणार असून आतापर्यंत नागपूर, अमरावती, चंद्रपूर व आज यवतमाळ या ठिकाणी जनमत चाचणी झाली. या जनमत चाचणीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या जनमत चाचणीच्या यशस्वितेसाठी राजू पड्गीलवार, विजय निवल, क्रांती धोटे, अॅड. अजय चमेडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − = zero