वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी राज्य सक्षम -राजेंद्र मुळक
यवतमाळ दि. 02 : राज्याला साडे चौदा हजार मेगावॅट वीजेची आवश्यकता आहे. या तुलनेत चौदा हजार दोनशे पन्नास मेगावॅट वीज निर्मिती होत असल्यामुळे राज्य वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी सक्षम आहे असे प्रतिपादन वित्त, उर्जा व सिंचन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
आर्णी तालुक्यातील जवळा येथे आज सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत 132 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपूजन करण्यात आले यावेळी राज्यमंत्री मुळक बोलत होते. आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, पं.स.सभापती राजीव विरखेडे, उपसभापती सारनाथ खडसे, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, जि.प.सदस्य देवानंद पवार, सोनबा मंगाम, विद्युत पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, वीज वितरणचे मुख्य अभियंता श्री. बोरकर, आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
राज्यात आता विज दर कमी झाले आहेत, असा उल्लेख करून राज्यमंत्री मुळक म्हणाले, वीजभार नियमन समस्या राहिली नाही, मात्र ज्या भागात वीज चोरीचे प्रमाण. वीज बिलाची रक्कम थकीत आहे तिथेच भारनियमन केले जाते. पेट्रोल, डिझेल, जसे ग्राहकाला रोखीने घ्यावे लागते तसेच विद्युत हे देखील इंधन आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा रोखीने घ्यावा लागतो म्हणून वीज निर्मिती करता यावी यासाठी वीज ग्राहकांनी बिलाची रक्कम नियमीतपणे भरावी तसेच वीज चोरीच्या अपप्रवृत्तीला आळा घालावा असेही आवाहन त्यांनी केले.
निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसन व इतर बाबींसाठी 150 कोटीची तरतूद 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. राज्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात औद्योगिक, कृषी व इतर क्षेत्रात राज्य देशात अग्रेसर आहे. त्यामुळेच विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या 132 के.व्ही. उपकेंद्राचे काम दर्जेदार व मुदतीत पुर्ण करावे. तसेच या केंद्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या कालावधीत या परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी अशा सूचनाही ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केल्या.
जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रामुळे याच भागातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सुटतील असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केला. निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी वन कायद्यासह इतर येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री व इतर जेष्ठ मंत्र्यांच्या पुढाकाराने सोडविण्यात आल्या असून या प्रकल्पाला अंतिम मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसनासाठी 150 कोटी रुपयाची निधी शासनाकडून उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा श्री. मोघे यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मुक्ता बेले, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, अधिक्षक अभियंता वासुदेव खाडे, श्री.जाधव, कार्यकारी अभियंता सुरेश पाठक, सुनील शेरेकर, रुपेश फरकाडे, श्री. तगलपल्लेवार, तहसिलदार नरेंद्र दुबे, प्रतिष्ठीत नागरिक भरत राठोड, बाळासाहेब शिंदे, डॉ. चव्हाण, नाना पाटील, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अधिक्षक अभियंता वंदन मेंढे यांनी मानले. सूत्र संचालन जयंत वाघमारे यांनी केले.










