
यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील रायसा व सगदा येथे शेतात वीज पडल्याने दोन महिलांसह दोन मुली ठार झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी चार वाजताचे दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रायसा येथील शेतकरी विजय बाबाराव मंगाम यांच्या शेतात त्यांची पत्नी गिता विजय मंगाम (३५), परिंदा लक्ष्मण मंगाम (१३) व ममता बाबाराव मंगाम (१४) ह्या कामे करीत होत्या. अशातच दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने त्या तिघीही घटनास्थळीच ठार झाल्या. तर पारवा परिसरातीलच सगदा येथे दुपारचे दरम्यान मलकन्ना बंकीनवार यांच्या शेतात वीज पडल्याने मीरा नारायण आदीरकार (५२) ही महिला ठार झाली आहे. या घटनेची वार्ता पसरताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. याघटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम.एम. जोरवर, पंचायत समिती सभापती रुपेश कल्यमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Archive for August 20th, 2014
0
वीज कोसळून चार ठार
0
न्यायालयात महिलांचे शोषण, न्यायाधीश निलंबित

मुंबई- मुंबई शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. गायकवाड यांना महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल शालिनी फनसळकर- जोशी यांनी या वृत्तला दुजोरा दिला आहे.
या महिलेने न्यायालयातच लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी न्यायाधीश एस. डी. तुलनकर यांच्यामार्फत करण्यात आली. यात गायकवाड यांनी संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच महिलेने केलेल्या आरोपात प्रथमदर्शिनी तथ्य असल्याचे आढळल्याने गायकवाड यांना निलंबित केले आहे. गायकवाड मुंबईतील शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयातील विशेष नार्कोटीक विभागाच्या न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्यायालयात काम करणा-या कनिष्ठ कर्मचारी महिलेने गायकवाड यांनी कार्यालयातच गैरवर्तन करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गायकवाड यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश तुलनकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कार्यालयातील अन्य काही महिलांनीही गायकवाड हे कार्यालयातील महिला कर्मचा-यांसोबत अनुचित गैरवर्तन करत असल्याचे सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिशांमार्फत नियुक्त करण्यात येणा-या वरिष्ठ न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
0
१८ वर्षांनी सापडला ‘त्या’ जवानाचा मृतदेह

श्रीनगर,दि. २० – काश्मीरमधील सियाचीन येथील बर्फाच्छादित प्रदेशात बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा मृतदेह तब्बल १८ वर्षांनी सापडला असून बुधवारी त्या जवानाचे पार्थिव उत्तरप्रदेशमधील मूळगावी नेण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या १५ राजपूत रेजिमेंटमधील हवालदार गया प्रसाद हे १९९६ मध्ये सियाचीन येथे बेपत्ता झाले होते. सैन्याच्या जवानांनी त्यांचा शोधही घेतला पण यात त्यांना अपयश आले. गया प्रसाद हे मुळचे उत्तरप्रदेशमधील मणिपूरी येथील रहिवासी होते. गया प्रसाद यांचे मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला नव्हता. ‘माझ्या मुलाचा मृत्यू झाला हे आम्हाला माहित होते. पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करता आले नाही याची खंत आम्हाला वाटत होती असे गया प्रसाद यांचे वृद्ध वडिल सांगतात. गया प्रसाद यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मुळगावी आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सियाचीनमध्ये पेट्रोलिंग करणा-या जवानांना बर्फात हात दिसला. या जवानांनी थोडे खणले असता बर्फाच्या खाली गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळील ओळखपत्रावरुन गया प्रसाद यांची ओळख पटली. बर्फाच्छादीत परिसर असल्याने मृतदेह दिर्घकाळ टिकून राहतात. या भागात अनेक जवानांचे मृतदेह आढळले आहेत असे सैन्यातील एका अधिका-याने सांगितले. गया प्रसाद यांच्या पश्चात पत्नी रमा देवी, मुलगा सतीश आणि मुलगी मीना आणि मंजू असा परिवार आहे.











