
यवतमाळ, दि.१९ – अनैतिक संबंधातून पतीसह तीन जणांनी पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील जामडोह येथे १८ जुलै रोजी रात्री ही घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
देविदास लखमा गुजरे (४०) रा. जामडोह असे मृतकाचे तर रतन शंकर वाठोळकर, पप्पू, बाल्या, बिडी अशी आरोपींची नावे आहे. मृतक देविदास गुजरे याचे गावातील रतन शंकर वाठोळकर याच्या पत्नीसोबत सूत जुळले होते. त्याच्या संबंधाची भनक रतनला लागली होती. त्या दोघांनाही आरोपीची समजुत काढल्यानंतरही ऐंकत नव्हते. आरोपी रतन वाठोळकरने तीन साथीदाराच्या मदतीने कट रचून देविदासचा काटा काढण्याचा बेत आखला. दरम्यान १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता आरोपींनी धारदार सशस्त्रांनी सपासवर वार करून देविदास गुजरेचा जागीच खात्मा केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, शहरचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, रवी सुरोशे व पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाची बहिण शोभा विठ्ठल कुंभेकर (४५) रा. जामडोह यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारही आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Archive for July 19th, 2015
0
पत्नीच्या प्रियकराचा खून
0
दरड कोसळून दोन ठार

पुणे, दि. १९ – मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळल्याने मुंबई – पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांनी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरुन प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ रविवारी सकाळी दरड कोसळली. ही दरड दोन चारचाकी वाहनांवर कोसळल्याने या दुर्घटनेत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. दिलीप पटेल व शशिकांत धामणकर अशी या मृतांची नावे आहेत. तर तीन महिला प्रवासी अपघातात जखमी झाल्या आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. दुपारनंतर एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारा एकेरी मार्ग खुला करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरु आहे.
एक्सप्रेस वेवरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. एक्सप्रेस वे खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून या प्रवासांना रेल्वेकडून दिलासा मिळाला आहे. रेल्वेने मुंबई व पुणे स्थानकावरुन रात्री आठच्या सुमारास विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
0
टीम इंडियाचा विजयी

हरारे, दि. १९ – ग्रीम क्रेमरच्या फिरकीने भारताला गुंडाळले असून दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाव्बेने भारतावर १० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. रॉबिन उथप्पाच्या ४२ धावांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
हरारे येथे रंगलेल्या दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभाने ६७ धावांची खेळी करत संघाला १४५ धावांचा पल्ला गाठून दिला. झिम्बाब्वेने २० षटकांत ७ गडी गमावत १४५ धावा केल्या. भारतातर्फे मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. झिम्बाब्वेच्या १४६ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ३ धावांवर धावबाद झाला. रॉबिन उथप्पा व मुरली विजयने फटकेबाजी करत भारतीय संघाला अर्धशतकापर्यंत पोहोचवले. मात्र मुरली विजय १३ धावांवर बाद झाल्यावर भारताची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. रॉबिन उथप्पाने एकाकी झुंज देत ४२ धावा केल्या. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात तोदेखील बाद झाला. केदार जाधव ५ तर मनिष पांडे भोपळा न फोडताच माघारी परतला. यानंतर स्टुअर्ट बिन्नीने २४ धावा तर संजू सॅमसनने १९ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र एकही फलंदाज भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताला २० षटकांत ९ गडी गमावत १३५ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेच्या ग्रीम क्रेमरने ४ षटकांत १८ धावा देत तीन विकेट घेतल्या. क्रेमरच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना लगाम लावला. या सामन्यात भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले. एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिल्यानंतर टी – २० मालिकेतही झिम्बाब्वेवर विजय मिळवण्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा निर्धार होता. मात्र दोन सामन्यांची टी -२० मालिका झिम्बाब्वेला १-१ अशा बरोबरीत सोडवण्यात यश आले.
0
‘लोडशेडिंग’ कमीसाठी आमदाराला बांधले
मुगलसराय (उत्तरप्रदेश) सतत लोडशेडिंगच्या होणा-या त्रासाला कंटाळून लोकांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका आमदाराला चक्क बांधून ठेवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे रविवारी घडली. लोडशेडिंगची कपात कमी करावी अशी वेळोवेळी मागणी करुनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या लोकांनी हे पाऊल उचलले. शनिवारी देशभरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदचे औचित्य साधून बसपाचे आमदार बब्बन सिंह चौहान आणि स्थानिय नेते कयामुद्दीन हे रविवारी सकाळी मुगलसरायमधील चंदौलीमध्ये गेले असता, सततच्या लोडशेडिंगला कंटाळलेल्या लोकांनी आमदाराच्या शुभेच्या स्वीकारण्याऐवजी त्यांना दोरीने बांधून ठेवले. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थित झाला. जमाव मोठा असल्याने पोलीसही काहीच करु शकले नाहीत. संतप्त झालेल्या लोकांनी जवळपाल दीड तास आमदाराला दोरीने बांधून ठेवले. लोकांनी आमदाराला बांधून ठेवल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदारांनी स्थानिक लोकांना लोडशेडिंग कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोकांनी आमदाराची सुटका केली. दरम्यान, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात वीजेची चोरी होत असल्याने याला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड २१ जुलै पासून वीज चोरीविरुद्ध अभियान राबविणार आहे.
0
फेसबुकवरील मैत्रीमुळे डॉक्टरला २५ लाखाचा गंडा

उस्मानाबाद – तुळजापूर येथील उच्चशिक्षित डॉक्टरला फेसबुकवरून मैत्री करणे महागात पडले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून (सोशल मिडीया) आकर्षित व भुरळ पाडणारे फोटो दाखवत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुण डॉक्टरला २५ लाखाचा गंडा एका टोळीने घातला.
तुळजापूर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील (रा. पाटोदा) याने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील व्हॉट्सअप ग्रुपमधील बारा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. पवन पाटील यांनी स्वतःचे फेसबुक अकाऊंट आहे. फेसबुकवर चॅटींगचा खेळ करीत असताना त्यांची मैत्री एका मुलीसोबत झाली. त्यावेळी प्रियांका शहा नावाच्या या मुलीने डॉक्टर पवन यांच्याशी सलगी वाढवित त्यांना आकर्षित केले. तिने सुंदर फोटोद्वारे डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखविले व आई-वडिल म्हणून इतर लोकांना डॉ. पवन बरोबर फोनद्वारे बोलायला लावले. लग्नाची आमिषे यातच डॉक्टर फसले. तिने डॉक्टरकडे पैशाची मागणी केली. त्यांनी बँक खात्यावर आतापर्यंत २५ लाख रुपये भरले.जेव्हा डॉक्टर संभाव्य पत्नी होणाऱ्या या सुंदर मुलीला भेटण्यास गेले तेव्हा या मुलीने भेट टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरचा संशय बळावला व फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रियांका उर्फ अपर्णाने दिलेल्या पत्त्यावर घराचा शोध घेतला असता सत्य समोर आले. अपर्णा उर्फ प्रियांका ही ३५ ते ४० वर्षाची विवाहिता आहे.
याप्रकरणी पुण्यातील अपर्णा संताजी उर्फ सत्यजीत बसवंत हिच्यासह कुणाल गांधी, संताजी बसवंती, सुरेश भोसेकर, भविष्या वाडिया उर्फ पिंकी, एम. वाडिया, दीपिका पंडित, विजू उर्फ राघवेंद्र कटाप, आकाश चव्हाण, गौरी उर्फ रेणुका काकडे, कौशल्य नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यापैकी तीन जणांना तुळजापूर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.
0
उत्तराखंड प्रकोप- पाऊस, भूस्खलन, भूकंप

डेहराडून- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये पर्वत भेगाळल्याने भूस्खलनाचे संकट ओढावले असताना चामोली जिल्ह्याला रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे या भागातील तब्बल १० हजार नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
उत्तराखंड राज्यातील अनेक परिसरात रविवारी सकाळी भूकंपाचे हल्के धक्के जाणवले. रविवार सकाळी सव्वा पाचच्या सुमारास भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० नोंदविण्यात आली. उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र कोठेही जीवित आणि वित्तहानीचे वृत्त नाही.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्या असून गंगोत्रीकडे जाणारा महामार्ग दरड कोसळल्याने बंद झाला आहे. खबरदारीसाठी राज्य प्रशासनाने भूस्खलन होत असलेल्या भागात मदत व बचाव पथके तैनात ठेवली आहेत.
तांबा खानी भागात १७०० मीटर उंचीवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पर्वताला भेगा पडत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंडसह श्रीहेमकुंड साहीब, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मध्येही आणखी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
दिल्लीत १६ मुलींची बलात्कारानंतर हत्या

नवी दिल्ली- दिल्लीत एका २४ वर्षीय नराधमाने तीन महिने ते ६ वर्षे वयाच्या १६ मुलींवर बलात्कार करुन नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे.
एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रविंदर कुमार (२४) याने चौकशी दरम्यान आतापर्यंत १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी बेगमपूर परिसरातून १४ जुलै रोजी रविंदर कुमार याला अटक केली. चौकशी दरम्यान रविंदरने २००९ पासून आतापर्यंत तीन महिने ते ६ वर्षापर्यंतच्या १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. रविंदर मूळचा उत्तर प्रदेशमधील बदायूं येथील रहिवासी आहे.
रविंदर कुमार याने २००९ ते जून २०१५ या कालावधीत दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये १६ मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.
रविंदर हा छोट्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात असे. व तेथे तो त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करून मृतदेह कॅनल किंवा शेतात फेकून देत असे.
१४ जुलै रोजी सहा वर्षीय मुलीची बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे आली. बेगमपुरा भागातून बेपत्ता झालेल्या या मुलीचा मृतदेह एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आढळून आला. या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.
या ठिकाणी मिळालेल्या चालक परवान्यावरून पोलिसांनी रविंदर कुमारला अटक केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणी हा धक्कादायक खुलासा झाल्याचे पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.









