
नवी दिल्ली – तब्बल २१ वर्षानंतर सियाचीन ग्लेशिअरमध्ये मरण पावलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह सापडला आहे. तुकाराम पाटील असे या मृत जवानाचे नाव असून, ते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सियाचीन ही जगातील सर्वात उंच युध्दभूमी आहे.
फेब्रुवारी १९९३ मध्ये तुकाराम पाटील सियाचीनमधील एका हिमदरीत पडले होते. हवाईमार्गे मिळणारी मदत स्वीकारत असताना, ते मार्ग भरकटून एका हिमदरीत पडले. यावेळी त्यांच्यासोबत असणा-या जवानांनी त्यांना हाताला धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र हातातील बर्फाचे ग्लोव्हज निसटले आणि पाटील कित्येक फूट खोल दरीत पडले. यानंतर त्यांचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
मागच्या रविवारी लष्कराचे जवान गस्त घालत असताना, त्यांना तुकाराम पाटील यांचा गोठलेला मृतदेह सापडला. महत्वाचे म्हणजे अत्यंत थंड वातावरणामुळे तुकाराम पाटील यांचा मृतदेह खराब झालेला नाही. त्यांच्या खिशातील पत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन त्यांची ओळख पटली. त्यांच्या भावाचाही १९८७ मध्ये सियाचीनमध्ये तैनात असताना मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही.
Archive for October 18th, 2014
0
२१ वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह
0
त्या’ डॉक्टरांचे हात तोडेन!

पाटणा-‘गरीबांवर उपचार करण्यास डॉक्टरांनी टाळाटाळ केली किंवा हलगर्जीपणा केला तर त्या डॉक्टरांचे हात तोडून टाकेन,’ अशी धमकी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असे वक्तव्य केल्यामुळे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील पाकरी दयाल येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘लोकांनी बोगस डॉक्टरांकडे जाण्याचे टाळावे, त्याऐवजी सरकारी रुग्णालयात जावे, असे सांगून ते म्हणाले, ‘सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास, औषधांची सोय नसल्यास किंवा आरोग्य तपासणीची सुविधा नसल्यास थेट जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. तिथे तुमच्या तक्रारीचे निवारण न झाल्यास मला पोस्टाने कळवा. मी तत्काळ कारवाई करीन. गरीबांच्या जिवाशी खेळणाऱ्या कुठल्याही डॉक्टरला सोडणार नाही.’
यावेळी त्यांनी आपल्या कठोर स्वभावाचीही आठवण उपस्थितांना करून दिली. ‘मी पाटणा येथील औषध घोटाळ्याचा शोध लावला, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना घरी बसवलं. तसंच पीएमसीएच घोटाळ्याबाबतही कडक पावलं उचलली होती,’ असं त्यांनी सांगितलं.
0
व्हिडिओ शेअरीमध्ये फेसबुक अव्वल

न्यूयॉर्क- व्हिडिओ शेअरीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या युट्यूबला फेसबुककडून येणा-या काळात धोका निर्माण झाल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकवर व्हिडिओ शेअरीग करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही काळातच फेसबुक युट्यूबला मागे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरात एक लाख ८० हजार पोस्ट आणि २० हजारहून अधिक फेसबुक पेजेसचा अभ्यास केल्यानंतर हा निकर्ष काढण्यात आला आहे.
इंटरनेट युझर्स व्हिडिओ थेट फेसबुकवर अपलोड करत आहेत. याचाच अर्थ असा होतो की युझर्स युट्यूबपेक्षा व्हिडिओ शेअर करण्यासाठी फेसबुकला प्राधान्य देत आहेत.
युट्यूबसाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे युट्यूबवरील व्हिडिओ शेअरिंगचा काही टक्का फेसबुककडे वळू शकतो. सप्टेंबर महिन्यात एक बिलियन व्हिडिओ अपलोड झाल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
0
जयललिता तुरुंगातून बाहेर

बंगळूरु – सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन मंजूर केल्यानंतर बंगळूरुच्या विशेष न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. शनिवारी दुपारी जयललिता कारागृहाबाहेर येताच अण्णाद्रमुकच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मागच्या वीस दिवसापासून त्या तुरुंगात बंद होत्या.
न्यायालयाच्या आदेशानुसार जयललिता यांनी दोन कोटी रुपयांचा जातमुचलका भरण्यास तयारी दर्शवल्याने विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉन मिशेल कुन्हा यांनी हे सुटकेचे आदेश दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची एक प्रतही जयललिता यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयासमोर सादर केली होती.
जयललिता यांचे निकटवर्तीय शशिकला आणि नातेवाईक सुधाकरन आणि इरावरसी यांनीही जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्याही सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारनंतर जयललिता तसेच इतर तिघांचीही तुरुंगातून सुटका करण्यात येईल.
२७ सप्टेंबर रोजी ६६.६५ कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकऱणी जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास तसेच १०० कोटींची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी कर्नाटक उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. तेथेही याचिका फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला
0
निकालाला उरले काही तास

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला काही तासांचा अवधी उरला आहे. अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दोन दशकानंतर महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने राज्यात कोणाची किती ताकत आहे ते स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे ४८ तास उरले असताना, युती-आघाडी तुटली आणि वर्षानूवर्षाचे मित्र स्पर्धक म्हणून परस्परांसमोर उभे ठाकले.
प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला सरल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात वीसहून जास्त सभा झाल्या. यापूर्वीचे पंतप्रधान एका राज्याच्या निवडणुकीत कधीही इतके सक्रीय झाले नव्हते.
पंचरंगी लढत असलेल्या महाराष्ट्रात मतदार कुठल्या एकापक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवणार की, पुन्हा युती-आघाडी करण्याचा कौल देणार ते उद्या स्पष्ट होईल.
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी रविवार १९ ऑक्टोबरला होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ आणि हरयाणातील ९० मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होईल.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्टात ६३.१३ टक्के मतदान झाले तर हरयाणात ७६.५४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. महाराष्ट्रातील २८८ केंद्रांवर ही मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासोबत १५ ऑक्टोबरला बीड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. त्याचाही निकाल रविवारीच स्पष्ट होणार आहे.
दोन दशकानंतर राज्यात प्रथमच सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने या निवडणुकीत २८० उमेदवार तर बसपा २६०, सीपीआय ३४, सीपीएम १९, काँग्रेस २८७, राष्ट्रवादी २७८, शिवसेना २८२ आणि मनसेने २१९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. २८८ जागांसाठी सुमारे चार हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
हरयाणातीलही ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. रविवारी दुपारी अथवा संध्याकाळपर्यंत हरयाणतील निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ९० केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत हरयाणातील एक हजार ३५१ उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते तर आयएनएलडीने ८८ उमेदवार, बसपाचे ८७, एचजेसी ६५, सीपीएम १७, सीपीआय १४, २९७ नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार तर ६०३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली.
२००९ मधील हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवला होता. तर आयएनएलडीने ३१, भाजप ४, एचजेसीने सहा, एसएडी आणि बसपाने प्रत्येकी एक तर सात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.













