Archive for October 12th, 2014
0
बसपाचे तीन नगरसेवक काँग्रेसला पाठींबा

यवतमाळ : बहुजन समाज पार्टीच्या तीन नगरसेवकांनी काँग्रेस, पिरीपा मित्र पक्षाचे उमेदवार राहुल ठाकरे यांना आपला पाठींबा दिला. नगरसेवक पंकज मेश्राम, विद्यमान शिक्षण सभापती ज्योती आडे, नगरसेवक हरिश पिल्लारे या तिननगरसेवकांसह भाजपा नगरसेविका मिना मसराम यांचे पती राहुल मसराम यांचा समावेश आहे. बसपा नगरसेवकांनी विनाअट पाठींबा दिल्याने राहुल ठाकरेंची बाजू भक्कम झाली आहे.बसपाचे संगटन वाढविण्यासाठी आम्ही जीवाभावाने काम केले. मात्र पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेतृत्त्वाने कधीही सन्मान केला नाही. परिणामी पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काँग्रेसचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करणारा व धर्मनिरपेक्ष विचारांना बळ देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बसपाच्या तीन नगरसेवकांसह भाजपा नगरसेविकांच्या पतीच्या पाठींब्यामुळे राहुल ठाकरे यांची बाजू भक्कम झाली आहे.
0
काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचा विकास – दिग्विजयसिंह

यवतमाळ – काँग्रेसला भ्रष्टाचारी संबोधणाºयाभाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच देशाचा विकास झाला असून त्याचे श्रेय लाटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी दिग्विजयसिंह यांनी केला. येथील काँग्रेस कमिटीच्याजिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल ठाकरे यांच्या प्रचारार्थ ते आले होते.गेल्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याचे आरोप भाजप करीत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीके त भारत मजबूत आणि विकसित देश असल्याचे बोलतात. मग चार महिन्यात देशाचा विकास झाला का असा प्रश्न दिग्विजयसिंहयांनी उपस्थित केला. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत असून, त्याला खतपाणी घालण्याचे काम संघ करीत आहे. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत लोकांना उल्लू बनविण्याचे काम करीत असल्याची तोफ डागली. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून मिरविण्यात येत आहे. कारण त्याचा प्रचार तसा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र महाराष्टÑ गुजरातपेक्षा कितीतरी पटीने समोर आहे. संघ आपली विचारधारा वाढविण्याऐवजी मोदीरिझ्यम वाढवित आहे. महाराष्टÑात काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेसच्या दबावातून मुक्त झाली असून, काँग्रेसच विकास करणारा पक्ष असल्याचे दिग्विजयसिंह म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, आ. हरिभाऊ राठोड उपस्थित होते.
0
६ लाखाची देशी दारू जप्त
उत्पादन शुल्कच्या १०७ धाडी, ५७ आरोपींना अटक
यवतमाळ – निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आरंभलेले धाडसत्र सुरुच असून गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या धाडीत देशी दारुचे ५९ बॉक्स म्हणजे २८३२ बॉटल्स जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर या विभागाने धडक मोहिम राबविले असून त्याअंतर्गत आतापर्यंत १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली, तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून या विभागाच्या पथकाने सापळा रचुन डोंगरखडा ते राळेगाव रोडवर मजरा गावाच्या शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा ५ किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून ८ देशी दारुचे बॉक्स आरोपींकडून जप्त केले. मोटर सायकलसह आरोपी नंदकिशोर जयस्वाल, पवन दडमल यांना अटक केली. आज अशाच प्रकारच्या गुप्त माहितीवरून राळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या कोपरी या गावाच्या हद्दीत एका घरी धाड टाकून देशी दारुचे ५१ बॉक्स जप्त केले. तसेच आरोपी गजानन मारोती पराते व गजानन किसनाजी कुचनकार यांना अटक करण्यात आली. या दारूची किंमत ७६ हजार इतकी आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यात केलेली जप्तीचीही सर्वात मोठी कारवाई आहे.
प्रथम दर्शनी सदर दारू साठा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना वाटप करण्यासाठी पुरविण्यात येणार होता असे आढळून आले आहे. निवडणूकीस अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने ठिकठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमले असून अवैध मद्य विक्रीवर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणूक काळात आचारसंहिता लागल्यानंतर आतापर्यंत १२०७ लिटर देशी दारु, २८ लिटर विदेशी दारु, ४५ लिटर बियर, ५५० लिटर हातभट्टी, १२,५२७ लिटर मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला आहे. तसेच १ मारोती ओमनी, १ मारोती ८०० व १ मोटरसायकलचा समावेश आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक ए.बी. झाडे, ए.एम झुमडे, सुबोधकुमार केडीया, दुय्यम निरिक्षक उमेश शिरभाते, ए.पी. चिटमटवार, सहाय्यक दुय्यम निरिक्षक आर.एम.राठोड तसेच कर्मचारी एस.जी.घाटे, एम.पी.शेडे, ए.पठाण, एम.जी.रामटेके, संदीप मनवर, प्रविण मसराम, साठे, बळीराम मेश्राम, डी.बी.पेंदोर आदी सहभागी झाले होते.
0
भाजपने शिवसेना संपवली असती – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे हा सुवर्णक्षण शिवसेनेचा मुख्यमंत्री साजरा करेल. या सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रात किमान ५० योजना आम्ही पूर्ण करणार, अशी ‘ती’ महत्वाची घोषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केली. भाजपशी या निवडणुकीत युती केली असती तर शिवसेना संपली असती, असा हल्लाबोलही उद्धव यांनी केला. सभेचा शेवट करताना उद्धव आणि आदित्य यांनी जनसमुदायासमोर नतमस्तक होत ‘तुमच्या प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही’, अशा भावना व्यक्त केल्या.
‘वेडात मराठे वीर दौडले साथ’, असे म्हणून चालणार नाही आता ‘वेडात मराठे वीर दौडले एकसाथ’ असा नारा देत अंगार दाखवा आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवा. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा. पुढच्या दोन वर्षात उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे मी दाखवून देईन. माझी लढाई महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही मला प्रेम द्या, तुमचा विश्वसघात होणार नाही याची हमी मी देतो’, अशी सादही उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला यावेळी घातली.
मोदींच्या सभेला गुजरामधून माणसे आणली!
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
0
कॉंग्रेसची भाजपविरुद्ध आयोगात तक्रार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे केलेल्या भाषणाचा भाजप निवडणूक प्रचारासाठी वापर करत असल्याची तक्रार कॉंग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या शासकीय दौऱ्यातील भाषणाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करत असल्याबद्दल आक्षेप घेत ही तक्रार करण्यात आली असल्याची माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिली. प्रदेश कॉंग्रेसने राज्य तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरवर केलेलं भाषण सध्या विविध न्यूज चॅनेल्सवर दाखविण्यात येत आहे. भाजपतर्फे अशा प्रकारची जाहिरात देण्यात आलेली आहे. लोकसभेत विविध नेत्यांनी केलेली भाषणं निवडणूक काळात प्रचारादरम्यान दाखविण्यावर बंदी असताना शासकीय दौऱ्यातील पंतप्रधानांच्या भाषण दाखविण्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.












