यवतमाळ दि. १९ – जनरेटर घेऊन जाणाºया टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना दारव्हा रोडवर आज रविवारी दुपारी २.३० वाजता घडली.
तरुण भारत शहा (२०) रा. महादेव मंदिरजवळ यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. वसीम पठाण यांच्या एम.एच. २९ / वाय १७८६ क्रमांकाच्या दुचाकीने तरुण हा लोहाºयाकडे जात होता. अशातच कोल्हे ले आऊटमधून जेनरेटर घेऊन जाणारा टेम्पोने (एम.एच. ३१ डब्ल्यु ६०८९) दारव्हा रोडवरील झुलेलाल प्राईड जवळ जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सूरज प्रकाश तैलान (२४) रा. महादेव मंदिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रियाझ खान अय्युब खा पठाण (३०) रा. पांढरकवडा रोड रचना ले आऊट यवतमाळ याच्याविरूद्घ शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.
Archive for April 19th, 2015
टेम्पोच्या धडकेत युवक ठार
0
तीन महिन्यात राज्यातील तब्बल ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या

मुंबई – अवकाळी पाऊस, गारपिट आणि दुष्काळाच्या तडाख्यात यंदा राज्यातील बळीराजा होरपळत आहे. नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल ६०१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण पाहता प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात असल्याचे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
२०१४ मध्ये शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण एक हजार ९८१ होते. यावर्षी केवळ तीन महिन्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले आहे. आधीच दुष्काळ आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान विदर्भातील ३१९ शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकाल. तर त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो मराठवाड्याचा. गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील २१५ शेतक-यांना स्वत;हून आपले जीवन संपवले.
0
तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘शोले’ पाकिस्तानात प्रदर्शित

इस्लामाबाद – भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलीवूडचा हिट चित्रपट शोले तब्बल ४० वर्षांनंतर शुक्रवारी अखेर पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटातील अनेक संवादही चाहत्यांच्या तोंडी आहेत. अजूनही टिव्हीवर हा चित्रपट लागल्यास प्रेक्षक तितक्याच उत्साहाने या चित्रपटाची मजा घेतात. मंद्विदवाला एन्टरटेनमेंटचे मालक नदीम मंद्विदवाला यांनी शुक्रवारी हा चित्रपट संपूर्ण पाकिस्तानात प्रदर्शित केला. कराची मध्ये या चित्रपटाचा ग्रॅँड प्रिमियरही ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती.१९७५ मध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम गाठले.
0
महिला खासदाराचा डान्स ,३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले

अहमदाबाद : हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले. टीव्हीवर संपूर्ण देशातील जनतेने नोटांचा पाऊस आणि त्यानंतर साचलेला नोटांचा ढीग पाहिला. गुजरातमध्ये वेरावळ इथल्या एका भागवतकथा कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता.
पैशांचा असा पाऊस यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवतेय का, नाही ना? पण ते येथे सत्यात उतरले होते. गुजरातमध्ये पैसे उधळले जाताहेत व या नोटांच्या पावसात बेभान होऊन नाचत आहेत, चक्क भाजपाच्या खासदारबाई. शेकडो लोकांसमोर थिरकणाऱ्या या पूनमबेन गुजरातमधल्या जामनगरच्या खासदार आहेत. अहीर समाजाच्या कार्यक्रमाला जणू रंगरसिया ज्वर चढला. चाळिशीतल्या खा. पूनमबेन बेधुंद नाचत होत्या. त्यांच्या तालावर एका बुजुर्ग स्थानिक नेत्यानेही ठुमका धरला व शेकडो लोकांनी नोटा उधळल्या. लोकही एवढे बेधुंद होऊन नाचत होते की काही तर एकमेकांच्या खांद्यावर बसून नोटांचा वर्षाव करीत होते.
देणगीदाखल पैसे उधळले
सौराष्ट्रची ही शंभर वर्षांची परंपरा (लोक दायरो) आहे. देणगीत मिळालेल्या पैशांचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमात मी यापूर्वीही सहभागी होत आले आहे. या पैशाचा उपयोग मुलींसाठी वसतिगृह आणि गोशाळा बांधण्यासाठी केला जाईल. भाजपची खासदार म्हणून नव्हे, तर समाजकन्या म्हणून मी यात सहभागी झाले. भाविकांवर देणगीदाखल नोटांची ही उधळण करण्यात आली, अशी सारवासारव खा. पूनमबेन यांनी केली.
0
मृत महिलेच्या जमिनीची परस्पर विक्री

नागपूर : मृत महिलेच्या नावावर असलेली कोट्यवधीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आली. यासाठी आरोपींनी जमीनमालक मृत महिलेच्या नावाखाली भलत्याच महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केले. १४ मे २०१० ते २० आॅगस्ट २०१० या कालावधीतील घडलेला गैरप्रकार आता उघड झाल्यानंतर सदर पोलिसांनी चंद्रपूरच्या एका टोळीविरुद्ध गुन्हे दाखल केले.
विवेक पांडुरंग पडगेलवार (वय ४४, रा़ वडगाव, लक्ष्मीनगर, चंद्रपूर), राहुल राजाराम कांबळे (वय ४५, रा़ उंटखाना, चंद्रपूर), सुनील भाऊराव खोब्रागडे (वय २९, रा. नागसेननगर, भद्रावती), पंकज मेनिनाथ नागदेवते (वय ४०, रा़ बापटनगर, चंद्रपूर) आणि एक महिला प्रमिला नामदेवराव रंगारी यांच्या नावाने अधिकाऱ्यांसमोर हजर झाली) अशी आरोपींची नावे आहेत.
विहीरगाव चंद्रपूर येथील प्रमिला नामदेवराव रंगारी यांची मौजा डोंगरगाव येथे जमीन होती. त्यांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश रंगारी (वय ५५) जगन्नाथ बाबानगर चंद्रपूर येथे राहतात. या जमिनीकडे अविनाश यांचे दुर्लक्ष झाले. आरोपींनी त्याचा लाभ उठवत कोट्यवधींच्या या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ती विकण्यासाठी आरोपींनी ग्राहकही शोधला. त्यानंतर प्रमिला रंगारी यांच्या नावाखाली भलत्याच महिलेला निबंधक कार्यालयात हजर करून ही जमीन विकली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर अविनाश यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या.
0
भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

रोम, दि. 19 – भूमध्य सागरात लिबियाच्या हद्दीत बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेनंतर इटली व अन्य देशांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भूमध्य सागरात इटलीच्या दक्षिणेकडील लम्पेदुसा बेटाजवळ लिबियाच्या हद्दीत प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बोट शनिवारी रात्री बुडाली. या जहाजातील फक्त 28 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. तर सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या एका अधिका-याने वर्तवली आहे. मृतांचा नेमका स्पष्ट झाल्यास हा दशकातील सर्वात मोठा अपघात ठरु शकतो असे जाणकारांनी सांगितले. या अपघाताविषयी इटलीच्या नौदलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातही भूमध्य सागरात लिबियातून येणारी बोट बुडून 400 जणांचा मृत्यू झाला होता.
0
भूसंपादन विधेयक गरिबांसाठीच, अंबानींसाठी नव्हे – मोदी

नवी दिल्ली, दि. 19 – भूसंपादनाविरोधात गैरसमज पसरवले जात असून हे विधेयक गोरगरिबांसाठीच आहेत. अंबानी किंवा पत्रकारांसाठी घर बांधण्यासाठी आम्ही जमीन घेत नाही हे लक्षात ठेवा असे आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांंवर निशाणा साधला आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांसाठी वर्कशॉप घेतला. यात मोदींनी सरकारच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली. सरकारी योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडे खासदारांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार गोरगरिबांना समर्पित आहे, त्यांच्या विकासासाठीच आम्ही योजना राबवत आहोत, गरिबांना 24 तास वीज व हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे मोदींनी स्पष्ट केले.
काही लोकांना आमच्या सरकारचे कौतुक करणे आवडत नाही, त्यामुळे ते आता आमच्यासंदर्भात कधीही चागलं बोलत नाही, आम्ही केलेले चांगलं काम त्यांना दिसत नाही व चांगलं ऐकूनही घेत नाही असे सांगत मोदींनी विरोधकांवर निशााणा साधला. फ्रान्ससोबत झालेला नागरी अणू करार ही भारतासाठी सर्वात महत्त्वाची बाब असून मेक इन इंडियामोहिमेपेक्षाही हा करार महत्त्वाचा आहे असे मोदींनी सांगितले.
0
उद्योजकांचे कर्ज फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक- राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. 19 – मोदी सरकार देशाचा पाया असलेल्या शेतक-यांना कमकूवत करत असून लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भूसंपादन विधेयक आणले जात आहे असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींच्या धोरणामुळे शेतकरी व कामगार वर्ग घाबरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष सोनिया गांधी व मनमोहन सिंग आदी नेत्यांनी संबोधित केले. सुमारे दोन महिने आत्मचिंतन करुन राहुल गांधी आज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राहुल गांधी आक्रमक शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. देशाच्या विकासासाठी मेक इन इंडिया व उद्योग क्षेत्राच्या विस्ताराची आवश्यकता आहेच पण त्यासोबत शेतकरीही तितकाच आवश्यक आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतक-यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. मात्र मोदी हा पाया कमकुवत करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
केंद्र सरकार फक्त श्रीमंत व उद्योजकांसाठीच काम करत असल्याचे शेतक-यांना वाटत असून त्यांची जमीन कधीही हिसकावून घेतली जाईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. मोदी शेतक-यांना त्यांची जमीन उद्योजकांना विकण्यासाठी भाग पाडत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठीच मोदी शेतक-यांची जमीन उद्योजकांना देत आहे. यासाठीच भूसंपादन विधेयक आणले गेले असे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारचे भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचे होते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर मोदी सरकारने खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली असून गेल्या 11 महिन्यांत सरकारने नेमके काय केले असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.











