यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार
यवतमाळ – जिल्हा वार्षिक योजना विकासाला हातभार लावणारी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत कामांच्या मंजूरीचे अधिकार जिल्ह्याला असल्याने आणि मंजूर कामांना तातडीने निधी उपलब्ध होत असल्याने गेल्याकाही वर्षात सर्वसामान्यांना दिलासा देणारी शेकडो कामे योजनेतून झाली आहे. गेल्या सहावर्षात या योजनेचा विकास आराखडा तिप्पटीने वाढला आहे. योजनेतून गेल्यावर्षी ३५३ कोटींची विकास कामे झाली तर यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी जिल्हा वार्षिक आराखडा तयार होत असतो. या आराखड्यात सर्वसाधारण आराखडा, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना अशा तीन उपयोजनांचा समावेश असतो. सन २००८-९ मध्ये या तीनही उपयोजनेंतर्गत जिल्ह्याचा वार्षिक आराखडा ११६.६२ कोटी इतका होता.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या भूमिका व आग्रहामुळे हा आराखडा दरवर्षी सातत्याते वाढत गेला. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात या योजनेंतर्गत १५७ कोटी रुपयांचा विकास कामांवर खर्च झाला. सन २०१०-११ मध्ये २०६ कोटी, सन २०११-१२ मध्ये २७२ कोटी, सन २०१२-१३ मध्ये ३१४ कोटी तर गेल्यावर्षी सन २०१३-१४ मध्ये ३५२ कोटी ५३ लाख रुपये या योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध विकास कामांवर खर्च झाले.
जिल्हा विकास आराखडा हा जिल्ह्याच्या विकासासाठी असलेला अतिशय महत्वाचा आराखडा आहे. त्यामुळे या आराखड्यात सातत्याने वाढ करण्यावर भर राहीला आहे. या आराखड्यात होणारी वाढ जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी आहे. त्यामुळेच सन २०१४-१५ च्या आराखड्यात वाढ व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ.नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अमरावती येथे झालेल्या विभागीय नियोजन बैठकीत या आराखड्यांतर्गत अधिक निधी मिळावा म्हणून वित्तमंत्र्यांकडे आग्रह धरल्याने या वषीर्चा जिल्हा वार्षिक आराखडा ४१६ कोटीवर पोहचला आहे.
जिल्ह्याला मंजूर झालेला हा आराखडा विभागात सर्वात मोठा आराखडा ठरला आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात विकास कामांवर भर असल्याने रस्ते, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, अत्यावश्यक बांधकामे, लहान-मोठे तलाव, जलसंधारणांची कामे, शेतकºयांना व्याज सवलत योजना, शेतकºयांना जोडधंदे आदी स्वरुपाचे शेकडो कामे या योजनेत करण्यात आली आहे.





















