
पुणे- पाळण्यातून पडू नये म्हणून सुरक्षेसाठी बांधलेली ओढणीच अवघ्या अकरा महिन्यांच्या चिमुरडीच्या जिवावर बेतली. झोपेत चुकून या ओढणीचा चिमुरडीच्या गळ्याला फास लागल्याने तिचा मृत्यू झाला. चिखलीतील जाधववाडी येथे रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सौम्या महेश तळोले असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. मे महिन्यात तिचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौम्याच्या आईने सौम्याला आंघोळ घालून पाळण्यात झोपवले होते. नेहमीप्रमाणे झोपेत उसळी मारल्यानंतर सौम्या पाळण्यातून खाली पडू नये यासाठी सौम्याला पाळण्यात ओढणीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, झोपेतच ती खाली सरकत गेली आणि त्यामुळे सौम्याच्या गळ्याला ओढणीचा फास लागला. ओढणीने फास लागलेल्या अवस्थेतच सौम्या पाळण्यातून लटकत असलेल्या अवस्थेत ती घरच्यांना आढळून आली.
Archive for April, 2014
0
आईच्या ओढणीनेच घेतला चिमुरडीचा जीव
0
इजिप्तमध्ये ६८२ जणांना फाशीची शिक्षा

कैरो – इजिप्तमधील न्यायालयाने सोमवारी मुस्लिम ब्रदरहूडचे प्रमुख मोहम्मद बदी आणि त्याच्या ६८२ समर्थकांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इजिप्तमधील तणाव आणखी भडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मोहम्मद मोर्सी यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटवल्यापासून इजिप्तमध्ये अशांतता आहे.
पोलिसांवर हल्ला करणे, त्यांची हत्या करणे या आरोपांखाली न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्यावर्षी १४ ऑगस्ट रोजी मोर्सी समर्थकांनी दक्षिण मिन्यामध्ये एक पोलिस ठाण्यावर हल्ला करुन, पोलिसांची हत्या केली होती. फाशीची शिक्षा सुनावलेल्या ६८२ दोषींपैकी ५० पोलिसांच्या ताब्यात आहेत, काही जण जामिनावर बाहेर आहेत तर, काही फरार आहेत.
न्यायालयाबाहेर शिक्षा ऐकण्यासाठी थांबलेल्या दोषींच्या महिला नातेवाईक फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर तेथेच चक्कर येऊन कोसळल्या. दुस-या एका प्रकरणात याच न्यायालयाने आज ४९२ दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली. मागच्या महिन्यात न्यायालयाने ५२९ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
0
युरोपात हापूस आंब्यासह भारतीय भाज्यांवर बंदी

लंडन- फळांचा राजा म्हणून केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ओळखल्या जाणा-या हापूस आंब्यासह अन्य चार भारतीय भाज्यांवर एक मे पासून युरोपीयन संघटनेतील २८ देशांनी बंदी घातली आहे. हापूससह अन्य भाज्यांवर घालण्यात आलेल्या या बंदीचा भारतीय कायदेतज्ञ आणि व्यापा-यांनी निषेध केला आहे.
यासंदर्भात आयोग्य विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१३मध्ये युरोपीय बाजारपेठेत भारतातून आयात केलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये इतर भाज्यांवर प्रादूर्भाव करणारे कीटक आढळल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. अर्थात समितीने ही बंदी तात्पूर्ती घातल्याचे स्पष्ट केले आहे. यात हापूस आणि आंबा, वांगी, आळू, कारले, पडवळ या भाज्यांचा समावेश आहे. एकट्या इंग्लंडमध्ये दरवर्षी तब्बल १६ दशलक्ष आंब्यांची निर्यात केली जाते. ही बंदी हटवण्यासंदर्भातील पुनः विचार ३१ डिसेंबर २०१५ रोजी घेतला जाणार आहे. या बंदीमुळे लाखो डॉलर्सचा तोटा होण्याचा दावा व्यावसाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे बंदी घालण्यात आलेली फळे आणि भाज्यांचे प्रमाण हे एकूण निर्यात केल्या जाणा-या भाज्यांच्या तुलनेत केवळ पाच टक्के असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
0
मामाने केला भाचीवर बलात्कार

बीड : मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बीड शहरात घडली. शहरातील नामदेवनगर भागात राहणाऱ्या चुलत मामाने भाचीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड शहरातील नामदेवनगर भागात चुलत मामाने भाचीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. हा मामा आपल्या चुलत बहिणीच्या घरी गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होता. मात्र, घरातील चुलत बहिणीच्या पंधरा वर्षांच्या मुलींवर घरात कुणी नसल्याचे पाहून त्याने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चुलत भावाविरोधात मुलीवर बलात्कार केल्याचीतक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिकतपास पोलिस उपनिरीक्षक आहेत.
0
रामदेव बाबांवर अॅट्रॉसिटी

नागपूर – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दलितांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात नागपूरमध्ये अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदेव यांना तत्काळ अटक करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्यात रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी लखनऊमध्येही रामदेव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून रामदेव यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरू लागली आहे.
राहुल हे दलितांच्या घरामध्ये हनिमून साजरे करण्यासाठी जातात, असे वादग्रस्त विधान रामदेव यांनी केले होते. त्यानंतर रामदेव यांच्याविरोधात देशभरातून दलित बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रामदेव यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने रामदेव यांच्या राजकीय योग शिबीरांवर १६ मेपर्यंत बंदी घातली आहे. रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी दलितांचा राग काही शांत झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनुसूचित जाती आयोगाची नोटिस
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही उत्तर प्रदेश सरकारला नोटिस पाठवून रामदेव यांच्यावरील कारवाईची माहिती मागितली आहे. सरकारकडून रामदेव यांच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली?, जर कारवाई करण्यात आली नसेल ती का केली गेली नाही?, याचे लेखी उत्तर आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी सरकारकडे मागितले आहे.
0
५ नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

मुंबई – वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी पाच नौदल अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे पबमधील बाउंसर्सनी बेदम चोप देत या रंगेल अधिकाऱ्यांना पबबाहेर हाकलल्यानंतरही या पाचही जणांनी या महिलेचा बोरिवलीपर्यंत पाठलाग केला. महिलेने धाडस दाखवून १०० नंबरवर कॉल केल्याने बोरिवली उड्डाणपूलाजवळच या अधिकाऱ्यांची नशा पोलिसांनी उतरवली.
तीर्थनाथ दिलिपनाथ (२५), आशिष जयकिसन (२९), महेश्वर सिंग (२६), चंदन मिश्रा (२६), श्याम भंडारे (२९) अशी अटक करण्यात आलेल्या पाच अधिकाऱ्यांची नावे असून ते चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आहेत. रविवारी १२.३० ते पहाटे ४ च्या दरम्यान ही घटना घडली. ही २५ वर्षीय महिला गुजरातमधील बॅंकर असून बिझनेसमन पतीबरोबर पाली व्हिलेज येथील एका पबमध्ये ती आली होती. त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही होते. या पबमध्ये आधीपासूनच हे पाचही अधिकारी होते व ते दारूच्या नशेत होते. महिलेकडे पाहून अश्लिल शेरेबोजी केल्यानंतर वादाला तोंड फुटले.
महिलेचा पती व शरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. बिझनेसमन, त्याचे मित्र आणि पाचही अधिकाऱ्यांमध्ये पबमध्येच धुमश्चक्री झाली. त्यानंतर पबच्या बाउंसर्सनी हस्तक्षेप करत रंगेल अधिकाऱ्यांना चोप दिला व पबबाहेर काढले. मात्र हे नाट्य इथेच संपले नाही. दीड वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य रिक्षाने बोरिवलीकडे जायला निघाले असता पबबाहेर दबा धरून बसलेल्या या पाचही जणांनी दोन रिक्षांमधून त्यांचा पाठलाग केला. जवळपास ४० मिनिटे पश्चिम द्रूतगती महामार्गावर पाठलागाचा हा भयंकर प्रकार सुरू होता. यादरम्यान ज्या रिक्षामध्ये हे दाम्पत्य बसले होते त्यावर लोखंडी रॉडने हल्लेही आले. या प्रकाराने भेदरलेल्या महिलेने १०० नंबरवर फोन केला. त्यानंतर काही वेळातच बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपींच्या रिक्षाला गाठले. बोरिवली उड्डाणपूलाजवळ या पाचही जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर छेडछाडीची घटना खार पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपींना खार पोलिसांकडे सोपवण्यात आले. रविवारी पाचही जणांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
0
भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी शिबिर

नागपूर – भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. सदर शाळेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती केली असून २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून ५ वा वर्ग सुरू करण्यात येत आहे. केजी ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे.
शाळेची इमारत ही मातृसेवा संघाजवळ, कोठी रोड महाल या शहराच्या मध्यभागी असून पंडित बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित आहे. ही शाळा संपूर्ण इंग्रजी माध्यमाची आहे. या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे सर्व अॅक्टिव्हीटी घेतल्या जातात. तसेच सर्व सण, उत्सव यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ते शाळेत साजरे करण्यात येतात. शाळेची फी अत्यंत माफक आहे. यासोबतच दरवर्षी विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केल्या जाते. यावर्षी महात्मे नेत्रपेढीतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलाप्रदर्शन, छंद शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला, संस्कृत व इंग्रजीचे संभाषण वर्ग, अबॅस्कस आदी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना दररोज नास्ताही देण्यात येतो. अधिक माहितीसाठी ९५९५३७४०६८, ९९२१७९६७३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापिका देऊळवाडकर यांनी केले आहे.
0
नीलेश वंजारी यांचा विवाह चिसौका माधुरी हीच्यासोबत २२ एप्रिल रोजी विवाह पार पडणार आहे. त्यानिमित्य मनपूर्वक शुभेच्छा !
0
सावत्रबापाकडून मुलीवर अत्याचार

यवतमाळ – सावत्र बापानेच तब्बल पाच वर्ष मुलीवर अत्याचार केल्याची घटना आज घाटंजी तालुक्यातील तीवसाळा येथे उजेडात आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापास पोलिसांनी अटक केली.
माणिक मारोती भगत (५५) रा. तीवसाळा असे नराधमाचे नाव आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने गावातीलच एका महिलेसोबत पुर्नविवाह केला. त्याला पहिल्या पत्नीचा मुलगा व तीला पहिल्या पतीची एक मुलगी आहे. काही दिवसाने सुखी संसार सुरु असताना या नराधमाची १६ वर्षीय सावत्रमुलीवरच नजर पडली. घरी कोणी नसताना तो तीच्यासोबत जबरीने अत्याचार करत होता. ही माहिती कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकही तो देत होता. त्यामुळे ही मुलगी बदनामी होईल म्हणून चुप्प राहत होत. २००९ पासून तर फेबु्रवारी २०१४ पर्यंत सतत हा किळसवाणा प्रकार सुरु होता. दरम्यान आज पिडीत मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगुन घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक एम.एम. राऊत करीत आहे.
0
युवतीवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ – बोरगाव घाटात विवाहितेवर सामूहिक अत्याचाराच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोच शहरालगतच्या पारवा-भारी येथे तीन युवकांनी एका युवतीवर सामूहीक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली.
मूळ अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील २१ वर्षीय युवती तीन महिन्यापासून मावस भावाच्या गावी पारवा येथे नोकरीच्या शोधात आली होती. यवतमाळात नोकरी मिळाल्याने काही दिवसापासून ती शहरातील जामनकर नगरमध्ये किरायाने खोली करून राहत आहे. यावेळी तिची ओळख एका मयुर नामक युवकासोबत झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने ते लग्नही करणार होते. मात्र त्या युवकाने विषारी औषध घेतल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्याच भेटीसाठी ती युवती रुग्णालयात गेली होती. यावेळी पारवा येथीलच विक्की व आकाश नावाच्या युवकांनी तिला दुचाकीवर बसवून नेले. रात्री १० वाजताच्या सुमारास पारवा येथील जिल्हा परिषद शाळेत तिच्यावर जबरीने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा भारी येथे शेतात नेऊन त्या दोघांनी व फिरोज नामक युवकाने अत्याचार केला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास तिला जामनकरनगरात आणून सोडले. या प्रकाराने भयभित झालेल्याने पीडितेने आज दुपारी वडगाव रोड ठाणे गाठून आपबीती सांगून तक्रार दिली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३७६ (ग) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
डॉ. दाभोलकर हत्याः आरोपींना जामीन

पुणे – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज पुणे कोर्टाने जामीन दिला. आरोपी मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने कोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.
इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्त्र पुरविल्याचा संशयाप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.
या दोघांना जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. ९० दिवसांनंतरही आरोपपत्र दाखल करण्यात पुणे पोलिसांना अपयश आले होते. परिणामी, आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता.
0
अ.भा. ब्राम्हण महासंघातर्फे १ मे रोजी ‘फोटोग्राफी’ स्पर्धा

नागपूर : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त लक्ष्मीनगर, सिस्फा गॅलरी यथे ‘फोटोग्राफी’ स्पर्धा व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अ. भा. ब्राम्हण महासंघाचे शिवानी दाणी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
छायाचित्र स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असून विदर्भातील अभयारण्य, धार्मिक स्थळ तसेच विदर्भाचे सांस्कृतिक व भौगोलिक दर्शन घडविणार्या छायाचित्रांचा यात समावेश राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क १00 रुपये आकारण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ५000 रुपये, द्वितीय पारितोषिक ३000 रुपये, तृतीय पारितोषिक २000 हजार रुपये देण्यात येईल. छायाचित्र प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रेक्षकांकरिता सुरू राहील. छायाचित्र पाठविण्यासाठी शिवानी दाणी-९८६0१३३८६0, मयुरेश जोशी- ८९७४७३७९९१ या भ्रमणध्वनी क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवाणी यांनी केले.
0
राज्यात ६१. ७१ टक्के मतदान

मुंबई- राज्यातील दुस-या टप्प्यात होत असलेल्या १९ लोकसभा मतदार संघात सरासरी ६१. ७१ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदार संघात ६८ टक्के तर सर्वात कमी मतदान सोलापूर आणि साताऱ्यामध्ये ५७ टक्के झाले आहे. काही तुरळक घटना वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. २००९ साली झालेल्या निवडणूकीत याच मतदार संघात सरासरी ५४. १४ मतदान झाले होते. त्यात यावर्षी जवळपास सहा टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी हिंगोली – ५८.३३ टक्के, परभणी – ५५.२१ टक्के, उस्मानाबाद – ५५.६१ टक्के, लातूर – ५८ टक्के, शिरुर – ५३.१० टक्के , मावळ – ५०.६५ टक्के, माढा – ५२ टक्के , सांगली – ५६.९१ टक्के, सातारा – ५०.३२ टक्के मतदान, कोल्हापूर – ६२ टक्के मतदान , हातकणंगले – ६१ टक्के मतदान , शिर्डी – ५४.६० टक्के , अहमदनगर – ५५ टक्के मतदान , बीड – ५५ टक्के , रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५३.६३ टक्के , सोलापूर – ४९ टक्के , नांदेड – ५५.३० टक्के , पुणे – ५१.२० टक्के , बारामती – ५०.५५ टक्के
0
मोदी हे ‘एन्काउंटर मिनिस्टर’- चिदंबरम

चेन्नई- नरेंद्र मोदी हे सतत खोटे बोलणारे आणि ‘एन्काउंटर मिनिस्टर’ असल्याची संभावना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे माझी ‘रिकाउंटर मिनिस्टर’ अशी संभावना करतात, मग मीही त्यांना ‘एन्काउंटर मिनिस्टर’ संबोधू शकतो, असे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये तामिळनाडूतील शिवगंगा येथून ३,५०० मतांनी चिदंबरम विजयी ठरले होते. तेथील मतमोजणी वादग्रस्त ठरली होती. शिवगंगा येथे फेरमतमोजणी झाली नाही ही बाब माहीत असूनही ते फेरमतमोजणी झाल्याचे सांगतात. त्यामुळे गुजरातमध्ये झालेल्या खोट्या चकमकीचा संदर्भ देत चिदंबरम यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
0
केजरीवालांच्या एका ट्विटने जमवले ८१ लाख

लखनऊ – वाराणसी आणि अमेठी मतदारासंघातून प्रचार करण्यासाठी स्वच्छ मार्गाने पैसे हवेत, अशा आशयाचे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटला प्रतिसाद म्हणून जगभरातून आम आदमी पक्षाच्या समर्थकांनी ८१ लाख रुपये देणगी दिली आहे. यातील १६ लाख एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाले आहेत. अमेठीच्या लोकांनी २.१० लाख तर वाराणसीच्या लोकांनी २.५० लाख रुपये दिले आहेत.
आम आदमी पक्षाला लोकसबा निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल ट्विट केले की, वाराणसी पोहचलो आहे. २० तारखेला अमेठीला जाणार आहे. मोदी आणि राहुल गांधींच्या विरोधात लढण्यासाठी स्वच्छ मार्गाने पैसे पाहिजेत. जर तुम्ही देणगी देऊ इच्छित साल तर मला मेसेज करा.’ काही तासातच १७०० लोकांनी हा ट्विट रिट्विट केला. तसेच आम आदमी पक्षाच्या देणगीतही वाढ होऊ लागली. बुधवारी संध्याकाळपर्यंत ६०० हून अधिक लोकांनी ८१.१० लाख रुपये देणगीस्वरुपात दिले. यात एक रुपयापासून ५० लाखापर्यंत देणगी देणारे समर्थक आहे. दिल्लीत राहणा-या नताशा हिने ५० लाख रुपये देणगी दिली आहे. अनेक लोकांनी ५० हजार ते एक लाख रुपये दिले आहेत. सर्वात जास्त लोकांनी ५०० ते ५००० रुपये देणगी दिली आहे. देशातून दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातून सर्वाधिक देणगी आली आहे. तर विदेशातून युएई, अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडातून लोकांनी देणगी दिली आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुधीर भारद्वाज यांनी सांगितले, की पक्षाच्या स्वयंसेवकांनी सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनामुळे पक्षाच्या आर्थिक अडचणी दूर होतील.
0
२४ तासात सहा लाखाहून अधिक ट्विटस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल साईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सध्या ट्विटरने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटमधील ट्विटरवर लोकसभा निवडणुकी संदर्भातील ट्विटची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ट्विटरवर गुरुवारी २४ तासात निवडणुकासंबधित सहा लाख २८ हजार ट्विटची नोंद झाली.
निवडणुकीतील उमेदवार, पत्रकार आणि सामान्य नागरिक निवडणुकासंदर्भातील बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, आपले मत मांडण्यासाठी ट्विटरचा वापर मोठ्या संख्येने करत असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ट्विटरचा वापर सर्वाधिक करतात. त्यापाठोपाठ आम आदमी पार्टी आणि iamwithcongress यांच्याद्वारे अधिक प्रमाणात ट्विट केले जातात. गुरुवारी २४ तासात निवडणुकीसंदर्भात सहा लाख २८ हजार ट्विट करण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले. किरण बेदी यांच्या ट्विटरवर सर्वाधिक रिट्विट केले जात आहे. त्याचबरोबर पत्रकार अनुराग धंडा यांनी मोदींच्या विवाहाबद्दल केलेल्या पोस्टवरही अधिक ट्विट केले जात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
0
बिहारमध्ये पाच नक्षलवादी ताब्यात

पटना – संपूर्ण देशात निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बिहार येथील चंपारण जिल्ह्यातून गुरुवारी सुरक्षा रक्षकांनी पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले.
चंपारण जिल्ह्यातील वाडा बिशानपूर-राजेपूर या भागातून कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून श्रीनारायण प्रसाद(४५), गणेश कुमार(२५), राजेश राम(१८), राजेश ठाकूर(२२) आणि दीपल राम(१८) अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांकडून दोन पिस्तुले, काही युद्ध सामग्री आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये सात जागांवर मतदान होत आहे. दुपारपर्य़ंत येथे २९ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.
0
मंत्र्याच्या इच्छेनुसार मतदान यंत्राची ‘दिशा’

कोलार (कर्नाटक) – लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री के. एच. मुनियप्पा यांना मतदान यंत्राची ‘दिशा’ योग्य वाटली नाही. त्यासाठी त्यांनी मतदान यंत्राची दिशा बदलण्याची मागणी निवडणूक अधिका-यांकडे केली. अधिका-यांनी तत्काळ त्यांच्या आदेशाचे पालन केले.
मुनियप्पा यांचे मतदान केंद्र हरोहल्ली मतदान केंद्रावर आहे. ते मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान यंत्राचे तोंड दक्षिणकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निवडणूक अधिका-याला मतदान यंत्र उत्तर-पूर्व दिशेला ठेवण्यास सांगितले. त्यानंतर अधिका-यांनी त्यांना मतदान यंत्राची दिशा बदलून दिली, अशी माहिती कोलारचे उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी डी. के. रवी यांनी दिली.
0
मानवी भाव-भावनांचा गुंता ‘पोस्टकार्ड’


‘अनुमती’ सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटानंतर ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहेत. ‘पोस्टकार्ड’ असे त्यांच्या नव्या चित्रपटाचे टायटल असून स्मिता विनय गानू आणि विनय गानू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन अशा विविध जबाबदा-या प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पार पाडल्या आहेत.
मानवी भाव-भावनांचा गुंता एका पोस्टमॅनच्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अनुमती’ चित्रपटासारखीच तगडी स्टारकास्ट ‘पोस्टकार्ड’मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचे रंग उधळणार आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवलमध्ये आधीच पसंती मिळालेला ‘पोस्टकार्ड’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.१९६५ ते ७० या दरम्यानच्या काळाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आलाय. एका पोस्टमॅनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दु:ख, आनंद याचा अनुभव पोस्टमॅनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमॅन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. रूपक कथा ह्या फार्म मध्ये हा ‘पोस्टकार्ड’ चित्रपट सादर होतो. जो मानवी भावनांचा गुंता आणि नियतीची अढळता यातुन काही भावव्याकुळ माणसं ह्या कथेत समोर येतात. ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत स्मिता विनय गानू व विनय गानू यांची निर्मिती असलेल्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आहेत. दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांचे आहे. तर कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, अभिनेत्री सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुहिता थत्ते, अभिनेता वैभव मांगले यांचा समावेश आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश राजगुरू, संकलन मयूर हरदास तर संगीत गंधार संगोराम व पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे. ध्वनी संयोजन नरेन्द्र भिडे, नृत्य संयोजन फुलवा खामकर तर कला दिग्दर्शन दत्ता लोंढे यांचे आहे. चित्रपटातील गाणी हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, नंदिनी श्रीकर या गायकांनी गायिली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून प्रशांत गोखले तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून रोहन शाह यांनी जबाबदारी पार पाडली.
0
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
ट्विटरवर चिवचिव करतोया
फेसबुकची पाने भरतोया
ब्लॉगही आला इन्टरनेटवर
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
साहेबी थाट अन इंग्लिशवाणी
संगणकावर भीमाची गाणी
हातात स्मार्टफोन व्हाट्सयाप खोले
बोटाबोटावर गुगल खेळतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
कितीकिती पोरं जयभीम बोलती
एकामताने रे तुटून पडती
असू दे भारी ही दिमाखमारी
त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
सायबरची पाने जयभीम म्हणे
बुद्धिस्ट फ्रेंड्स संगे धम्मभूमी जाणे
बहुजनांवर रिपब्लिकन फिवर
स्वाभिमानाचा नारा डोलतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
चळवळीसाठी भीमशक्ती पाठी
फुले शाहूंचा ललकार ओठी
अण्णा लहूजी बिरसा शिवबा
नव्या पिढीला एकसाथ जोडतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….
आनंद गायकवाड











