
यवतमाळ – शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज येथील निळोणा धरणात आढळल्याने एकच खळबळ उडाली़ अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भिमराव राजगडकर (१८) रा. बांगर नगर अशी मृतकांची नावे आहेत़
शुक्रवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते घरुन निघुन गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजून गेल्यानंतरही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे गाठून दोनही युवक बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान आज शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरुन वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश राठोड, सहा. पोलीस उपनिरीक्षक यु.एन. पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर ते अश्वजीत व पंकजचे असल्याचे उघड झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे़
Archive for April 12th, 2014
0
निळोणा धरणात दोन युवक बुडाले
0
माओवाद्यांचा निवडणूक पथकावर हल्ला, १३ ठार

सुकमा – निवडणुकीला विरोध करणा-या माओवाद्यांनी शनिवारी छत्तीसगडमध्ये केलेल्या दोन वेगवेगळया हल्ल्यांमध्ये १३ जण ठार झाले आहेत. ठार झालेल्या मध्ये सीआरपीएफच्या पाच जवानांचा समावेश आहे.
बिजापूरमध्ये माओवाद्यांनी सकळी अकराच्या सुमारास निवडणूक पथकाच्या सदस्यांना घेऊन जाणारी बस स्फोटामध्ये उडवून दिली. या हल्ल्यात निवडणूक पथकातील सात सदस्यांचा मृत्यू झाला. दुस-या एका घटनेत दर्भा घाटीमध्ये सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोटामध्ये उडवून दिली.
या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. चार जवान जखमी झाले. बस्तर येथील निवडणूकीचे काम संपवून हे पथक परतीच्या मार्गावर असताना हा हल्ला झाला.
या आठवडयाच्या सुरुवातीला सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या बस्तर जिल्ह्यात लोकसभेसाठी एकूण ४७ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी दहा एप्रिलला छत्तीसग़डमध्ये मतदान होत असताना माओवाद्यांनी दहा मतदान केंद्राजवळ गोळीबारही केला होता.
0
अमेठीमधून राहुल यांचा अर्ज दाखल

लखनऊ – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी गौरीगंज ते अमेठी जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंतच्या ४० कि.मी.च्या मार्गावर रोड शो केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांच्यासोबत त्यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बहिण प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा उपस्थित होते. राहुल यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही वयैक्तीक स्वरुपाची टिका केली नसल्याचे सांगितले.
मी मोदी यांच्याबद्दल कोणतेही वयैक्तीक स्वरुपाचे वक्तव्य केलेले नाही. मोदींनी यापूर्वी आपल्या विवाहाची माहिती दिली नव्हती एवढेच मी म्हटले. प्रियंका गांधी यांनीही राहुल यांचे समर्थन केले. राहुल यांनी फक्त नरेंद्र मोदींच्या प्रतिज्ञापत्रातील तथ्य लोकांसमोर मांडले असे प्रियंका म्हणाल्या. २००४ आणि २००९ प्रमाणे याही वेळी निवडणूक पूर्व सर्वेक्षण चाचण्यांचे अंदाज पूर्णपणे चुकतील असा दावा राहुल यांनी केला. अमेठीमधून दोनवेळा खासदार राहिलेले राहुल गांधी येथून तिस-यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी येथे तिरंगी सामना आहे. भाजपक़डून स्मृती इराणी आणि आम आदमी पक्षाकडून कुमार विश्वास रिंगणात आहेत.
0
नेमबाजी : मानवजीत संधूला सुवर्णपदक

नवी दिल्ली – अमेरिकेत झालेल्या आयएसएसफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या मानवजीत सिंह संधूने अचूक निशाणा साधत सुवर्णपदक पटकावले. त्याने दोनवेळच्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या मायकल डायमंडवर मात केली.
मानवजीतने पात्रता फेरीत १२१ आणि अंतिम फेरीत १३ गुणांची कमाई करुन सुवर्णपदक पटकावले. डायमंडने पात्रता फेरीत ११९ आणि अंतिम फेरीत नऊ गुणांचा कमाई केली. उपांत्यफेरीत मानवजीतने पंधरापैकी १४ वेळा लक्ष्यभेद केला. रशियाच्या अलेक्सी आलीपोव्हला कास्यपदक मिळाले. त्याने १२१ आणि १२ गुणांची कमाई केली.
जगातल्या सर्वोत्तम नेमबाजांमध्ये स्पर्धा होती. मायकल डायमंड सारख्या प्रतिस्पर्ध्या विरुध्द सामना जिंकणे एक आव्हान होते. मात्र मी अचूक लक्ष्य भेद केला. हिवाळी हंगामात मी या विश्वचषक स्पर्धेची तयारी केली होती असे विजयानंतर मानवजीतने सांगितले.२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये मानवजीतकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. पात्रता फेरीत त्याला १६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
0
नऊ कोटीची रोकड जप्त

बेल्लारी – निवडणूक अधिका-यांना शनिवारी पहाटे बेल्लारीमध्ये एका सावकाराच्या घरात बेहिशोबी नऊ कोटी रुपयांची रोकड सापडली.
परशुराम पुरिया असे या सावकाराचे नाव असून, गणेश कॉलनीमधील त्याच्या घरामध्ये त्याने मोठया प्रमाणावर रोख रक्कम ठेवल्याची निवडणूक अधिका-यांना खात्रीलायक माहिती मिळाली होती.
त्या आधारावर निवडणूक अधिका-यांनी पहाटे त्याच्या घरावर धाड टाकून शोध सुरु केला असता कपाट आणि पेटयांमध्ये नऊ कोटीची रोकड सापडली. या भागामध्ये चोर बाबुलाल म्हणून हा सावकार ओळखला जातो. गणेश कॉलनीमध्ये त्याची तीन घरे आहेत. निवडणूक अधिका-यांनी रीतसर सर्च वॉरंट मिळवून ही धाड टाकली.रोख रक्कमेबरोबर फिक्स डिपॉझिटच्या पावत्या, सोन्याची बिस्कीटे, वेगवेगळया जमीन व्यवहाराची कागदपत्रे आणि चेक सापडले. हा सावकार राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना व्याजावर पैसे देत होता असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये एका राजकीय पक्षाने पैसे परत केल्याचा चेकही सापडला.
0
६८ लाखांचे परकीय चलन जप्त

मुंबई – राज्य उत्पादन शुल्क व राज्य सरकारच्या भरारी पथकाने आरामबसमधून मुंबईत छुप्या पद्धतीने आणलेल्या सुमारे ६८ लाख ३७ हजार रुपये किमतीचे परकीय चलन व मद्यसाठा जप्त केला आहे. दाना बंदर येथील सोलापूर स्ट्रीट येथे कारवाईत मुद्देमालासह बसही जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोव्यातील दोन नागरिकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ग्रेट ब्रीटन पाउंड, अमेरिकन डॉलर, सिंगापूर डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, युरो, जपानी येन, सौदी रियाल, ओमनी रियाल, युएईचे दि-हाम, फ्रेंच फ्रँक, बहारिनचे दिनार व कुवेतचे दिनार अशा विविध १३ देशांतील चलनांचा समावेश आहे. ही रक्कम भारतीय बाजारभावानुसार ६८ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय २१ हजार ४०० किमतीचा मद्यसाठा जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.
0
राहुल गांधी १५ एप्रिल रोजी पुण्यात

मुंबई – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या १४ आणि १५ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल सोमवारी १४ एप्रिल रोजी लातूर व शिर्डी येथे जाहीर सभांना संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी, मंगळवारी १५ एप्रिल रोजी ते पुणे व हिंगोली येथे जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील.
0
सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली – तुम्हाला काही संशयित ई-मेल्स, लिंक किंवा ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स आल्यात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर तुमचे पासवर्ड तातडीने बदलून टाका. भारतीय सायबरविश्वात हार्टब्लीड नावाच्या व्हायरसने प्रवेश केला असून, त्यामुळे पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर आणि अन्य महत्त्वाची गुप्त माहिती हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. म्हणून, भारतीय सायबर तज्ज्ञांनी सर्व इंटरनेट वापरकर्त्यांना सुरक्षेचा इशारा दिला आहे.
हा व्हायरस खुल्या सिक्युअर सॉकेट लेयरवर (ओपन एसएसएल) हल्ला करतो. ‘ओपन एसएसएल’ हा ऑनलाइन यंत्रणेमधला सर्वांत महत्त्वाचा प्रोटोकॉल असून, माहिती सुरक्षित ठेवणे आणि माहितीचे इंटरनेटवर हस्तांतर करणे, यामध्ये तो प्रोटोकॉल महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची वैयक्तिक गुप्त माहिती, पासवर्ड आदी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ने (सर्ट-इन) व्यक्त केली आहे. ‘सर्ट-इन’ ही हॅकिंग, फिशिंगशी दोन हात करणारी; तसेच भारताच्या इंटरनेट डोमेनशी निगडित सुरक्षा वाढवण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. या व्हायरसपासून धोका खूप जास्त धोका असून, सर्व असुरक्षित यंत्रणा या व्हायरसला बळी पडू शकतात, असा इशारा या संस्थेने दिला आहे. लाल रंगाचा ‘एक्स’ किंवा स्राव होणाऱ्या हृदयाचे चिन्ह असे संशयित मेसेज आधी येऊ शकतात आणि नंतर व्हायरसचा हल्ला होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आपण काय करू शकतो?
तज्ज्ञाशी संपर्क साधून ‘ओपन एसएसएल’ची व्हर्जन ‘१.०.१जी’ अशी अपग्रेड करून घ्यावी. अँटीव्हायरस, ऑपरेटिंग सिस्टीम, फायरवॉल सिस्टीम आदी वेळेवर अपग्रेड करून घ्यावे. ई-मेल, बँकिंग यंत्रणा; तसेच महत्त्वाच्या ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड वेळोवेळी बदलावेत.
0
फेसबुकमुळे महिलांमध्ये नकारात्मक भावना

अमेरिका व ब्रिटिश विद्यापीठांचे संशोधन
वॉशिंग्टन – बराच वेळ फेसबुक वापरणाऱ्या महिलांना फेसबुकवरील इतर महिलांचे फोटो पाहून स्वतःमध्ये कमतरता आहे असे वाटायला लागते, असा धक्कादायक निष्कर्ष अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांनी केलेल्या एका संयुक्त संशोधनाद्वारे समोर आला आहे.
सिअॅटलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. हे संशोधन इंग्लंडमधील स्ट्रेथक्लेड विद्यापीठ आणि अमेरिकेतील आयोवा आणि ओहायो विद्यापीठात करण्यात आले आहे. त्यासाठी कॉलेजात जाणाऱ्या ८८१ तरुणींचा फेसबुक वापर, त्यांच्या खाद्य आणि व्यायामाच्या सवयी यांचा अभ्यास करण्यात आला.
या संशोधनात सामील असलेल्या संशोधिका पिटी एकलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फेसबुक बराच काळ वापरणाऱ्या महिला स्वतःच्या शरीरयष्टीची तुलना फेसबुकवरील इतर महिलांच्या फोटोंशी करतात. इतर फोटो अधिक सरस असल्याचे वाटून त्यांच्यामध्ये स्वतःबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागते.’ ‘महिला जितका अधिक वेळ फेसबुक वापरतात, तितकी त्यांच्यामध्ये नकात्मक भावना बळावते. त्याचप्रमाणे ज्या महिलांना स्वतःचे वजन कमी करायचे आहे, त्या महिला फेसबुकवर इतर महिलांच्या वेशभूषा आणि देहबोलीकडे जास्त लक्ष देऊन पाहतात,’ असेही पेटी यांनी सांगितले. स्वतःच्या देहाविषयी नकारात्मकता निर्माण झाल्यास खाण्याविषयी अनास्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर होत असल्यास ते अत्यंत धोकादायक आहे, असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.









