भंडारा, नागपुरात विशाल सभा; विदर्भात काँग्रेसमय वातावरण
नागपूर – काँग्रेसचा विश्वास केवळ कर्तृत्वावर आहे, ढोंगीपणावर नाही. काँग्रेसला विरोधी पक्षांसारखा न केलेल्या कामांचा ढोल वाजवता येत नाही आणि दिखावाही करता येत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केली आहे.
दि. 5 एप्रिल 2014 रोजी काँग्रेस अध्यक्षांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा-बीआरइएम आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास मुत्तेमवार व रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकूल वासनिक यांच्या प्रचारार्थ अनुक्रमे लाखनी व चिखली-कळमना येथे जाहीर सभांना संबोधित केले. या सभांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुकूल वासनिक आदी नेते उपस्थित होते.
या दोन्ही सभांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, पंडित नेहरूंनी देशाच्या औद्योगिकरणाची बीजे रोवली. इंदिरा गांधींनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण करून गावोगावी बॅंक उघडल्या. राजीव गांधींनी संगणक आणि संचार क्रांतीची मुहूर्तमेढ केली. भारत आज जगातील एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो, त्याचे मूळ काँग्रेसने केलेल्या अनेक कामांमध्ये दडले आहे. विरोधी पक्ष कितीही ढोल बडवत असला तरी त्यांच्याकडे कोणतेच धोरण नाही. काँग्रेस सामाजिक एकता व सद्भावनेवर विश्वास ठेवणारा पक्ष असून, विरोधी पक्षांनी समाजात फूट पाडण्याशिवाय दुसरे काहीच केलेले नाही. गोंधळ घालणे आणि काँग्रेसच्या क्रांतिकारी निर्णयांना विरोध करणे, हेच त्यांचे एकमेव काम आहे. अशा मानसिकतेपासून देशाला वाचविण्याची गरज असल्याचे काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी म्हणाल्या.




















