Archive for March, 2014
0
युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे बुधवारी यवतमाळात,भावना गवळींच्या प्रचारार्थ काढणार रॅली
यवतमाळ – युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे २ एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता अवधुत क्रिडा मैदानातून मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर नेर येथेही दुपारी १ वाजता मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
या रॅलीत महायुतीच्या उमेदवार भावना गवळी, शिवसेनेचे आ. संजय राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीकांत मुनगीनवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आ. मदन येरावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे,मनोज इंगोले, बाबासाहेब गाडे पाटील, राजू पडगीलवार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर, सुखदेव जाधव, गोविंद मेश्राम, भाजपचे अमर दिनकर, अमोल ढोणे, अजय बिहाडे, जयदीप सानप, प्रवीण प्रजापती, अजय राऊत, शिवसेनेचे प्रवीण पांडे, श्रीधर मोहोड, राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार, गजानन डोमाळे, किशोर इंगळे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. येथील अवधुत क्रिडा मैदानातून सुरु होणारी मोटर सायकल रॅली दत्त चौक, वीर वामनराव चौक, दाते चौक, सत्य साईज्योत मंगल कार्यालय, आर्णी रोड, बस स्थानक चौक, लाठीवाला पेट्रोल पंप, लोकमाता चौक, एलआयसी चौक, पोस्ट आॅफिस चौकी, स्टेट बँक चौकी, अप्सरा टॉकीज, इंदिरा मार्केट, शिवाजी चौक आदी मार्गाने जावून अवधुत क्रीडा मैदानावर पोहचेल. या ठिकाणी आदित्य ठाकरे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या मोटर सायकल रॅलीत राळेगाव, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ या तालुक्यातील युवा सेना, विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या वाहनांसह सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी गजानन बेजंकीवार, निखील पाटील जैत, पराग पिंगळे, अभिषेक पांडे, राजू दुधे,निखील वाघ यांनी केले आहे.
अपघातात न्यायदंडाधिकारी व चालकाचा मृत्यू
उस्मानाबाद- गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी आणि त्यांचा गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अतिरिक्त जिल्हाधिका-यांसह त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.लातूरहून गुलबर्गाकडे जाणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी अझीज तांबेळी यांच्या गाडीचे टायर फुटून सकाळी साडेनऊच्या सुमारास उमरग्याजवळ अपघात झाला. या अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी विश्वास गोंधपूरे आणि त्यांच्या गाडीच्या चालकाचा मत्यू झाला. अपघातात अझीज तांबोळी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा गांभीर जखमी झाले आहेत.
0
भाजप म्हणजे द्वेषाचे राजकारण – सोनिया गांधी
लखीमपुर (आसाम)- भाजपचे नेते केवळ मोठ्या गप्पा मारतात आणि द्वेषाचे राजकारण करतात, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. लखीमपूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत त्या रविवारी बोलत होत्या.
सध्या भाजपचे नेते देशभरात फिरून विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहेत. मात्र भाजपशासित राज्यांमध्ये कोणता विकास झाला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या बोलण्यात आणि करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतेक सर्व आश्वासने यूपीए सरकारने पूर्ण केली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील प्रत्येकाचा विकास करण्यावर काँग्रेसचा भर आहे.आम्ही कोणतीच खोटी आश्वासने देत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवत भाजप देशाला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून दिल्या जाणा-या खोट्या आश्वासनांना भुलून न जाता आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आणि योग्य निर्णय घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी नेहमीच बलिदान दिले आणि त्याग केला आहे. तर दुसरीकडे भाजप समजांमध्ये तेढ निर्माण करून फुटीरतावादी वृत्तींना खतपाणी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकारण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी यावेळी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले. देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांचे काय योगदान आहे? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनिया यांनी केला. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.
0
नववर्षाचे उत्साहात स्वागत
मुंबई- ढोलताशांचा गजर, सजवलेल्या पालख्या, दिंड्या, लेझिम पथके, मृदुंगाचा ताल, तुता-यांचा निनाद आणि विठुनामाचा गजर अशा मराठमोळ्या वातावरणात शोभा यात्रा काढून सोमवारी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच राज्यभर आनंदाची गुढी उभारुन या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
मराठी नूतनवर्ष गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या भव्य स्वागतयात्रांमुळे मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात पारंपरिक आणि संस्कृतीचे दर्शन घडले. पुणे, नाशिक, नागपूरसह मुंबईत गिरगाव, दादर, बोरीवली आणि ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, वसई भागातही भव्य अशा स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले.डोंबिवलीत निघालेल्या भव्य यात्रेदरम्यान दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला.गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मुलुंडच्या संभाजी मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांची दहा फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन केले
0
सेन्सेक्सचा नवा सर्वोच्च विक्रम
मुंबई- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा विक्रम केला. सोमवारी सकाळी बाजाराला सुरुवात होताच उर्जा, तेल, गॅस, वाहन आणि बँकींग क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रमी खरेदीने निर्देशांक २२,४६४.८६ या नव्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ३२.९५ अंकानी वाढ झाल्याने निफ्टीनेही ६, ७२६.८५ असा उच्चांक गाठला.
‘बाझेल ३’ च्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाल्याने बँकिंग क्षेत्रात झालेल्या मोठ्या खरेदीने मागच्या आठवड्यातच सेन्सेक्सच्या तेजीला बळ मिळाले. शुक्रवारी सेन्सेक्स १२५.९० अंकांच्या वाढीसह २२,३३९.९७ वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ५४.१५ अंकांची वाढ झाली आणि तो ६.६९५.९० वर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार ‘एफआयआय’ने १२ मार्चपासून बाजारात १८,०७३ कोटींची गुंतवणूक केली आहे. विक्रमाकडे आठवडाभर मागे वळून न पाहणा-या भांडवली बाजाराच्या सोमवारच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली आहे. या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आणि मंगळवार एक एप्रिल रोजी रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, त्यामुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.
0
विमान घातपातामागे दहशतवादी?
लंडन- मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानामागे दहशतवादी कारवाईची शक्यता मलेशियाच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. या बाबींचा तपास करण्यासाठी त्यांनी इंग्लंड ‘एमआय-६’, अमेरिकेची ‘सीआयए’ आणि चीनच्या गुप्तचर संस्थांची मदत मागितली.
या गुप्तचर संस्थांनी वैमानिक जहारी अहमद शहाच्या घरी सापडलेल्या फ्लाइट सिम्युलेटरची तपासणी सुरू केली. अपघातामागे दहशतवादी, अपहरण, व्यक्तिगत आणि मानसिक समस्या असावी असा कयास आहे.विविध गुप्तचर संस्थांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे मलेशियाचे वाहतूकमंत्री हिशामुद्दीन हुसैन यांनी सांगितले. दरम्यान, विमान कोसळल्याचे पुरावे मलेशिया सरकारने द्यावेत, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
0
दहशतवादी भुल्लरला फाशीऐवजी जन्मठेप
नवी दिल्ली- खलिस्तानी दहशतवादी देविंदरपाल सिंग भुल्लर याला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करून ती जन्मठेपेवर आणण्याची केंद्र सरकारची शिफारस सर्वोच्च न्यायालयास मान्य केली. त्यानुसार भुल्लरची फाशी रद्द झाली असून ही शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे सप्टेंबर १९९३ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या बॉम्बस्फोटात नऊ जण ठार आणि २५ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर भुल्लरने दया अर्ज दाखल केला होता. मात्र त्याच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा विलंब झाल्याने या प्रकरणात शिक्षा परावर्तित होऊ शकते, असे महाधिवक्ता जी ई वहाणवटी यांनी सरन्यायाधीश सदासिवम यांच्या खंडपीठास सांगितले. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भुल्लरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पी सदासिवम, न्यायमूर्ती आर एम लोढा, न्यायमूर्ती एच एल दत्तु आणि न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यालयात १९९३साली भुल्लर याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात नऊजण ठार झाले होते. याप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षे हा दयाअर्ज राष्ट्रपतींच्या संमतीविना सरकारकडे पडून होता.
0
सत्ता असताना भाजपने काय केले – सोनिया

लखीमपुर – संपूर्ण देशात भाजप फक्त मोठमोठया घोषणा करत आहे. भाजपने नेहमीच व्देषाचे राजकरण केले आहे. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना त्यांनी काय केले ? बोलणे आणि काम करणे यात भरपूर फरक आहे अशा शब्दात संपुआ प्रमुख आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्या लखीमपूर येथील निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलत होत्या.
काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकरण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली. आता २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनेही आम्ही पूर्ण करु, पण त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे असे सोनिया म्हणाल्या.
आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जी आश्वासने देतो ती पूर्ण करतो. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले.
देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते ? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही याचे काय योगदान आहे ? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनियांनी केला. विरोधकांच्या खोटया प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.
0
लोकसभा निवडणूक, सुरक्षेसाठी दोन लाख जवान

नवी दिल्ली – लोकसभेच्या नऊ टप्प्यांमध्ये होणा-या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट लागू नये, निवडणूका शांततेत पार पाडाव्यात यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेची जोरदार तयारी केली आहे.
संपूर्ण देशात दीड महिना चालणा-या मतदान प्रक्रियेसाठी निमलष्करी दलाचे दोन लाख शस्त्रसज्ज जवान, हजारो गाडया आणि डझनभर हॅलिकॉप्टर तैनात केली आहेत. सात एप्रिलपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. देशातील एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघात ८१.४ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हिंसाचाराची शक्यता असलेली माओवाद प्रभावित राज्ये, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये सुरक्षा बंदोबस्तावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाच्या जवानांसह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्सच्या जवानांचाही बंदोबस्त असणार आहे.
निवडणूक काळात निमलष्करी दलाच्या जवानांच्या प्रवासासाठी गृहमंत्रालय शंभरहून अधिक ट्रेनचा वापर करणार आहे. गृहमंत्रालयाने रेल्वेला तशी ट्रेन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सुरक्षेच्या गरजेनुसार या जवानांची तैनाती केली जाईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर केला जाईल जवळचा प्रवास रस्ते मार्गाने केला जाईल. त्याशिवाय हजारो खासगी गाडयाही भाडयावर घेण्यात येणार आहेत.
0
आवडेल तेथे कोठेही प्रवास’ १ एप्रिलपासून महागणार
‘
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र एसटीची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गतचा प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. या योजनेतील चार व सात दिवसांच्या पासच्या किमतीत २५ ते ४० रुपयांनी वाढ होणार आहे.
एसटीच्या ताफ्यात सुमारे १७ हजार बस आहेत. प्रवाशांना प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना सुरू केली. प्रवाशांचाही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेंतर्गत चार व सात दिवसांचा पास दिला जातो. पासमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली.
मात्र वाढत्या महागाईमुळे एसटीने या पासची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. इंधनाबरोबरच गाडय़ांच्या सुटय़ा भागांचे भावही वाढल्याने एसटीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तिकीटदरातील वाढीपाठोपाठ सवलतीच्या पासमध्येही दरवाढ करण्यास एसटीला भाग पडत आहे, असे एसटीच्या अधिका-याने सांगितले. मात्र ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गत १ एप्रिल पूर्वी पास काढला असल्यास त्या संबंधित प्रवाशांकडून पूर्वीचेच दर आकारले जाणार आहेत.
0
काँग्रेस-भाजपमध्ये ४७ जागांवर अटीतटीचा सामना

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ४७ जागांवर अटीतटीची लढत झाली होती.
फार थोडया फरकाने या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपचे उमदेवार विजयी झाले होते. थोडा जास्त जोर लावला असता तर, चित्र वेगळे दिसले असते अशी त्यावेळची दोन्ही पक्षांची भावना होती.
त्यामुळे या ४७ जागांवर यावेळी दोन्ही पक्षांनी नवीन उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या जागांवरील निकाल काँग्रेस आणि भाजप दोघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. २००९ मध्ये भाजप आणि काँग्रेसने लढवलेल्या ३४ जागा अशा होत्या जिथे उमेदवार तीन टक्क्याहून कमी मताधिक्क्याने निवडून आले होते.
यंदा दोन्ही पक्षांनी ४७ पैकी तेरा जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारीनुसार रांची, गुलबर्गा, इंदूर, गुरदासपूर आणि सुंदरगडमध्ये उमेदवार कायम ठेवण्यात आले आहेत. २००९ मध्ये अटीतटीची लढत झालेल्या ४७ जागांपैकी २८ काँग्रेसने तर, १९ भाजपने जिंकल्या होत्या.
0
मृत्यूच्या दाढेतून भावाने बहिणीला वाचवले

मुंबई – एक्स्प्रेस पकडण्याच्या गोंधळात पाय निसटून सात वर्षांची चिमुरडी प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडते आणि एकच गोंधळ उडतो. शनिवारी सकाळी मध्य रेल्वेवरील दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थरारक प्रसंग निर्माण होतो. आपली बहीण प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याचे समजताच भाऊ जिवाच्या आकांताने तिला सुरक्षितपणे वाचवण्यासाठी उडी मारतो. अखेरीस दोघेही अंगावर एकही ओरखडा उमटता बचावतात.
उत्तर प्रदेशमधून आलेले भारद्वाज कुटुंबीय शनिवारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यात संजीव भारद्वाज आणि त्यांच्या दोन बहिणी, भावाचा समावेश होता. सकाळी सात वाजून एक मिनिटांनी दादर येथून सुटणारी इंटरसिटी पकडण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली होती. ही गाडी पकडण्याच्या गोंधळात सुनीताचा (७) पाय सरकून ती गॅपमध्ये अडकली. हे पाहताच तिची बहीण अनिता (१६) आणि दुसरा भाऊ शंकर यांनी मदतीसाठी टाहो पुकारला. संजीवने खाली उतरून तिला आडवे पडत घट्ट धरून ठेवले. त्यांचा आवाज ऐकून एका प्रवाशाने तात्काळ आपत्कालीन मदतीसाठी असणारी साखळी खेचली. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या मिस्त्री नावाच्या कॉन्स्टेबलनेही गार्डला त्याची माहिती दिली. तोपर्यंत इंटरसिटी सुमारे २० मीटर पुढे गेली होती. पण सुनीता आणि तिच्या मदतीसाठी धावलेला संजीव हे दोघेही सुरक्षित होते.
परतवाडामध्ये आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागातील वृंदावन फॅशन या कपडयाच्या दुकानाला रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमधे दोन मुलं आणि दोन महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परतवाडयातील टिळक चौक भागात हे दुकान आहे.या दुकानात ओटवाल कुटुंब रहात होते. दुकानात आग भडकली तेव्हा सर्वजण गाढ झोपेत असल्याचा अंदाज आहे. झोपेत असताना, आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आगाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दल आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.
0
अॅटो चालकाची हत्या

वणी- वणी तालुक्यातील धुनकी येथील २४ वर्षीय तरुणाची हत्या करुन शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड पुरड शिवारातील रेल्वे पटरीवर टाकण्यात आल्याची घटना दि़२९ मार्चला उघडकीस आली़
धुनकी येथे वास्तव्यास असणारे अॅटो चालक नरेंद्र दामोदर सरपटे हे आपल्या मामाकडे देवादेवीच्या कार्यक्रमासाठी दि़२८ मार्चला पूरड येथे गेले होते़ त्या रात्री तो कार्यक्रम आटोपून ते गावी परत जात असतांना अज्ञान आरोपीने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली़ व पुरावा नष्ट करण्यासाठी नेरड पूरड शिवारातील कायर-मुकूटबनकडे जाणाºया रेल्वे रुळावार तो मृतदेह आणून टाकला़ ही बाब आज दि़२९ मार्चला टूड्रा येथील पोलीस पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी शिरपूर पोलीसांना सुचना दिली़ तर मृतकाचे मामा चंद्रशेखर श्रीराम कोंगरे यांच्या तक्रारीवरुन शिरपूर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द भादवी ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहे़
0
सेनापती म्हणून लोकसभेचा किल्ला लढवा – आ. राठोड

यवतमाळ – शिवसैनिकांनी गाव, विभागाच्या सेनापतीची जबाबदारी घेऊन लोक सभेचा किल्ला लढवून महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले.
मातोश्री विमलबाई चिरडे मंगल कार्यालय दिग्रस आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, नामदेव खोब्रागडे, सुधाकर तायडे, परमानंद अग्रवाल, अजय बिहाडे, बाळासाहेब मुनगिनवार, मोहन भोयर, जितेंद्र महाराज, राजेंद्र पडगिलवार, महादेव सुपारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ६० वर्षात काँग्रेसने रोटी, कपडा और मकान चा प्रश्न कायम ठेवला. महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. शेतकरी-शेतमजुर आत्महत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, मिडीयाच्या माध्यमातून जनता जागृत झाली असून काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने काँग्रेस नेते नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचेही त्या म्हणाल्या. तर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे म्हणाले की, देशात खरी लोक शाही आणण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारला उलथविण्याचा संकल्प करा. नरेंद्र मोंदीना पंतप्रधान करायचे असेल तर २७२ खासदारांच्या आकड्या पर्यंत पोहचण्यासाठी आवर्जुन मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले.
0
पाणी चोरणे महागात पडले; नागरिकावर गुन्हा

नेर – नगर परिषदची परवानगी न घेता पाईप लाईन फोडून पाणी चोरणाºया नागरिकाविरुद्घ गुन्हा दाखल केला. या कारवाईने पाणी चोरणाºया नागरिकांचे धाबे दणानले आहे.
मार्च एन्डींग असल्याने नगर परिषदने थकबाकी कर, पाणी कर, लाईन कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. आज शनिवारी नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व कर्मचाºयांनी वार्ड क्र. १६ चमननगर मध्ये ही मोहीम राबविली. यावेळी अब्दुल आदिल अब्दुल गफ्फार या व्यक्तीने नगर परिषदची परवानगी न घेता पाईप लाईन फोडली. त्यावरुन नळ कनेक्शन घेऊन पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहुण मुख्याधिकाºयांनी थेट पोलिस ठाणे गाठून पाणी चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल आदिल याच्याविरुद्घ भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. नगर परिषदकडे अर्ज करुनही नळ कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाईप लाईन फोडून पाणी चोरत असून याला प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पाणी चोरी करणाºया अनेक नागरिकांवर दंडात्मक कारवाई केला. मात्र पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची हि पहिलीच वेळ असावी. या कारवाईने अवैधपने नळ घेणाºया नागरिकांचे धाबे दणानले आहे.
0
लाखोचा गुटखा साठा जप्त

यवतमाळ – शहरातील तलाव फैल परिसरातील एका खोलीत असलेला गुटखा साठा आज सायंकाळी जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून एकास अटक केली.
बंट्टी उर्फ अतुल सुभाष डगवार (२८) रा. तलाव फैल असे आरोपीचे नाव असून त्याचे सरोज टॉकीज जवळ साईराम सुगंध सेंटर आहे. दररोज अवैधपने गुटखा, जर्दा तम्बाखुची विक्री करतो. तलाव फैलमधील नेवारे या महिलेच्या घरी त्याने खोली भाड्याने करुन तेथे गुटखा साठवून ठेवत होता. या बाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने आज शनिवारी सायंकाळी धाड टाकुन खोलीची झडती घेतली. यामध्ये गुटखा, जर्दा तंम्बाखु पुड्या निदर्शनास आल्या. यावेळी पोलिसांनी गुटखा साठा जप्त करुन आरोपीस अटक केली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे, प्रफुल येवले यांना पाचारण करुन गुटखा स्वाधिन केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल मनवर, तुषार नेवारे, इकबाल शेख, वसीम शेख, प्रमोद मडावी, विजय जाधव, संजय कांबळे, अन्सार बेग यांनी केली.
अपघातात तिन ठार
यवतमाळ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. दौलत तुकाराम नेवारे (४५) रा. देवी नगर लोहारा हे आपल्या दुचाकीने(एम.एच. २९/एफ ५९४९) इचोºयावरुन जात होते. अशातच दुचाकी भरधाव व निष्काळजीपने चालवुन वाहन रस्त्यावर आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीकृष्ण जागोजी भोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भानुदास चोपने रा. वरध अपार्टमेंन्ट वणी हे वरोरा रोडवर उभे होते. अशातच भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एम.एच. २९ टि ९२४) जोरदार धडक दिल्याने चोपने जागीच ठार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर चारगाव चौकीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रविंद्र नटकडे रा. शिरपूर हे जागीच ठार झाले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.
0
इंटरनेटवर अवैध छायाचित्र ओळखणारी यंत्रणा

इंटरनेट ही जगातील सर्वात मोठी गरज बनली आहे. जगाच्या कानाकोप-यांतील कोणतीही माहिती तुम्हाला इंटरनेटवरून तत्काळ मिळू शकते. याच इंटरनेटवर माहितीबरोबरच जगातील छायाचित्रांचा खजिना असतो. असंख्य नागरिक इंटरनेटवरून छायाचित्रे डाउनलोड करीत असतात. याच नेटवर अवैध छायाचित्रांचे प्रमाण मोठे आहे. ही छायाचित्रे ओळखणारी यंत्रणा संशोधकांनी शोधून काढली आहे.
नेदरलॅँडच्या व्टेन्ट विद्यापीठातील संशोधकांनी इंटरनेट वापरणा-या व्यक्तींच्या खासगीपणाला धक्का न लावता ही पद्धत विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर करून तुमचे नेटवर्क ‘स्वच्छ’ ठेवण्यास मदत मिळते. बालकांचे अश्लील चित्रीकरणासह अन्य बाबी शोधून काढण्यासाठी पोलिसांना या यंत्रणेचा लाभ घेता येऊ शकतो. इंटरनेटवरील तुमचा डेटाबेस गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. इंटरनेटवरील हॅकर्सचा माग काढणे ही तुम्हाला कठीण बनू शकते. पोलिसांच्या डेटाबेसमध्ये या नवीन यंत्रणेचा वापर केल्यास त्यांना अवैध छायाचित्रांचा धोका राहणार नाही, असे संशोधक अँड्रस पीटर यांनी सांगितले.

















