Archive for April 13th, 2014
0
अपघातात एक ठार, चार जखमी

यवतमाळ – भरधाव ट्रकने अलटो या वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार व चार जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी कळंब – राळेगाव मार्गावर घडली.
चंद्रपुर येथील लांडगे कुटुंबीय कळंब येथून लग्न समारंभ आटोपून एम. एच. ३४ / के ५२३८ क्रमांकाच्या अलटो या वाहनाने राळेगाव कडे जात होते. अशातच राळेगाववरुन कळंबकडे येणाºया एम. एच. ०४ / बि जी ८१० क्रमांकाच्या ट्रकने सदर वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये मोहुर्ले(३०) नामक युवकाचा मृत्यू झाला. तर सतीश लांडगे(४५), मनिषा सतीश लांडगे (४०), निवेदीता लांडगे (२२), पायल लांडगे (१०) सर्व रा. चंद्रपुर हे जखमी झाले. त्याच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
0
त्या’ युवकांच्या मृत्यूचे गुढ कायम, घातपाताचा संशय

यवतमाळ – दोन दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या दोन युवकांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोनही युवकांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मृत्यूचे गुढ कायम असून घातपात झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. आज रविवारी दुपारी इन कॅमेरा दोन्ही युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भीमराव राजगडकर (१८) रा. बांगरनगर अशी मृतांची नावे असून अश्वजीत हा वादाफळे महाविद्यालयात बीएसएसी (कृषी) भाग दोन तर पंकज हा जगदंबा विज्ञान महाविद्यालय इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अश्वजीत हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी तर पंकज हा चप्पल घेण्यासाठी जात असून अर्ध्या तासात परत येतो असे सांगून घरून निघाले होते. दुपार होऊनही घरी न परतल्याने कुटुंबियांनी दोघांच्याही मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यानंतर मित्र मंडळीकडे चौकशी केली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शहर पोलिस ठाणे गाठून बेपत्ता असल्याची रितसर तक्रार नोंदविली होती. अशातच काल शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती मिळताच शहर, वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढले. शहर पोलिसात दोन युवक बेपत्ता असल्याची नोंद असल्याने त्यांनी ठमके व राजगडकर कुटुंबियांना ओळख पटविण्यासाठी म्हणून घटनास्थळी बोलावून घेतले. दोन्ही मृतदेह अश्वजीत व पंकजचे असल्याची खात्री पटताच वडीलांनी टाहो फोडला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्रीच कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. आज दुपारी शवविच्छेदन इन कॅमेरा करावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांची झालेली गर्दी व घटनेचे गांभीर्य ओळखून इन कॅमेरा शवविच्छेदन केले. आज दुसºया दिवशीही या घटनेचे गुढ कायम असून प्रेमप्रकरणातून दोन्ही युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू बांगरनगर परिसरात सुरू होती. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी परिसर काढला पिंजून
यवतमाळ ग्रामीण, शहर व वडगाव रोड या तीन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी व ३० पोलिस कर्मचाºयांच्या पथकाने सकाळी निळोणा धरण गाठले. युवकांचे कपडे व साहित्य शोधण्यासाठी पथकाने तब्बल तीन तास परिसर पिंजून काढला. मात्र या ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले.
अश्वजीतला पोहता येत नव्हते: हर्षवर्धन ठमके
अश्वजीत व पंकज या दोघांना पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघेही पोहण्यासाठी धरणावर जाणे शक्य नाही. त्यांचा मृत्यू पोहताना झाला नसून घातपात झाल्याचा संशय अश्वजीतचे वडील हर्षवर्धन ठमके यांनी दै.‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केला. दोघांच्याही मृतदेहावर जखमा दिसून आल्या. बेपत्ता असल्यापासून अश्वजीतचा मोबाईल बंद आहे. मात्र काल सकाळी ११ वाजता दरम्यान नातेवाईकाने मोबाईलवर संपर्क केला असता ३० सेकंद बेल वाजली. त्यानंतर मोबाईल पुन्हा बंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेणार असल्याचे ठमके यांनी सांगितले.
0
चौथ्या टप्प्यात विक्रमी मतदान

नवी दिल्ली – नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले. देशातील चार राज्यातील सात लोकसभा मतदारसंघात शनिवारी मतदान पार पडले.
गोव्यातील दोन जागांसाठी ७५ टक्के, आसाममधील तीन जागांसाठी ७५ टक्के, त्रिपुरामधील एका जागेसाठी ८१.८ टक्के, सिक्कीममधील लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या ३२ जागांसाठी ७६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पहिल्या तीन टप्प्यांप्रमाणे चौथ्या टप्प्यातही मतदारांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. सकाळी सातवाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून सर्वच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. गोव्यात लोकसभेच्या दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत. चौथ्या टप्प्यात सात जागांवर एकूण ७४ उमेदवार रिंगणात आहेत.
0
जनमत चाचण्या चुकीच्या ठरणार – राहुल गांधी

अमेठी- जनमत चाचण्यांमधून काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे भाकीत केले जात असले तरी अशा जनमत चाचण्यांना काँग्रेसने नेहमीच चुकीचे ठरवले आहे आणि या वेळीही या चाचण्यांना चुकीचे ठरवत काँग्रेसलाच विजय मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
२००४ आणि २००९ मध्ये जनमत चाचण्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसच्या विरोधात भाकीत केले होते आणि या दोनही निवडणुकीत काँग्रेसनेच सत्ता मिळवून या चाचण्या चुकीच्या ठरवल्या होत्या. या निवडणुकीतही तसेच होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांचे अमेठीच्या नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी होत्या. या भावंडांचा ताफा अमेठीच्या रस्त्यावरून जात असताना त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पाहून दोघांनी हात उंचावून त्यांचे स्वागत स्वीकारले. राहुल आणि प्रियांका यांच्यावर या वेळी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. प्रियांका गांधींबरोबरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका या मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून स्मृती इराणी व ‘आप’चे कुमार विश्वास निवडणूक लढवत आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १४ आणि १५ एप्रिल रोजी राज्यात येणार आहेत. या दरम्यान ते भाऊसाहेब वाकचौरे, विश्वजीत कदम, राजीव सातव यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. १४ एप्रिलला शिर्डी व लातूर येथे तसेच १५ एप्रिल रोजी ते पुणे आणि हिंगोलीला प्रचारसभा घेतील. राज्य प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
0
महाराष्ट्रात १० लाखाहून अधिक तरुण मतदार

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मतदानाच्या एकूण नऊ टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत राज्यातील ७.८९ कोटी मतदारांपैकी १०.७ लाख मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील असून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. १.६६ कोटी लोकांपैकी सुमारे ६० टक्के लोकांनी मतदान केले.राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे(सोलापूर), भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे(बीड), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(नांदेड) आणि केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील(सांगली) या नेत्यांमध्ये जोरदार लढत होणार आहे. राज्यातील तिस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २४ एप्रिलला होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा १९ मतदारंसघामध्ये मतदान होणार आहे. राज्यात एकूण सात कोटी ८९ लाख ६६ हजार ६४२ मतदारांपैकी १० लाख ७५ हजार ३७६ मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील आहेत.
0
तेंडुलकर, गांगुली फुटबॉल संघांचे मालक

मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता इंडियन सुपर लीगमध्ये फुटबॉल संघांचे मालक झाले आहे. सचिनने कोची संघ विकत घेतला असून गांगुलीने त्याच्या घरचा म्हणजे कोलकाता संघासाठी यशस्वी बोली लावली. सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत कोची संघाचे हक्क मिळवले. याउलट गांगुलीने स्पेनमधील आघाडीचा क्लब अॅटलेटिको माद्रिद, हर्षवर्धन नोटिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख या व्यावसायिकांसोबत संयुक्तपणे कोलकाता संघाचे मालकी हक्क मिळवले.
मुंबई संघाची मालकी मिळवण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यश आले. त्याने बिमल पारेखसोबत मुंबई संघ विकत घेतला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पुण्याचा संघ विकत घेण्यात यशस्वी झाला. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान ग्रुपसोबत सलमानने ही यशस्वी बोली लावली. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आय-लीग संघ शिलॉँग लॅजॉँगसोबत गुवाहाटी संघ खरेदी केला. दिल्ली संघ घेण्यात समीर मनचंदा यांचा डेन नेटवर्क यशस्वी ठरला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकी असलेला सन ग्रुप बंगळूरु संघ यशस्वीपणे खरेदी करू शकला. व्हिडियोकॉनचे वेणुगोपाळ धूत, दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास डेंपो यांनी एकत्रितपणे गोवा संघाचे मालकी हक्क मिळवले. स्टार इंडियाच्यावतीने आयएमजी-रिलायन्सने या लीगचे आयोजन केले आहे. अर्थातच त्याला अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) पाठिंबा आहे. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ही लीग होणार आहे.
0
काश्मीरमध्ये दोन जवान शहीद

नवी दिल्ली – काश्मीरमधील पुलवामा परिसरात नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जवान शहीद झाले आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे कार्य़कर्ते यवार मसुदी यांच्या घरावर रविवारी दुपारी अतिरेक्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस जवान ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अब्दूल हमीद आणि विनोद कुमार अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.घटनेनंतर या परिसरात अधिक सैन्य पाठविण्यात आले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्थान घातल्याचे वृत्त आहे.
0
मोदींचे हिटलर बनण्याचे स्वप्न- शरद पवार

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून मोदी हे हिटलर बनण्याचे स्वप्न पाहात असल्याची टीका त्यांनी ट्विटरवर केली.
या देशात सध्या कोणीतरी हिटलर बनण्याचे स्वप्न पाहात आहे. अशा शक्तींना आपणच आवर घातला पाहिजे. या निवडणुकीत आपल्याला मोदींचा पराभव करावाच लागेल, असे ते म्हणाले. आम्ही संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळण्याच्या बाजूने आहोत. मात्र भाजपचे नेते खासगीत याबाबत टिंगल टवाळी करतात. असे नेते देश कसे चालवतील असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.











