
यवतमाळ – येथील जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पदभरतीचा परिक्षेपूर्वीच परिचरपदाच्या पेपर बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडगाव रोड पोलिसांनी आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा परिषदच्या ४५ परिचर पदाच्या लेखी परीक्षेसाठी १८ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. आज २२ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा दुपारच्या सत्रात घेण्यात आली. परीक्षेसाठी शहरातील जिल्हा परिषद शाळेत (काटेबाई) परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या केंद्रावर पेपर पोहताच तेथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाºयाने पेपरची प्रत एका कर्मचाºयाच्या हाताने बाहेर पाठविली. हा पेपर घेवून शहरातील एका कोचिंग क्लास संचालकाच्या हाती लागल्याने हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी विस्तार अधिकारी विक्रम राऊत यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. यापूर्वी विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री अशा चार संवर्गाच्या पदासाठी २ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे परीक्षार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण असताना दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Archive for November 22nd, 2014
0
यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा पेपर फुटला; विस्तार अधिकारी पोलिसांच्या जाळ््यात
0
बालकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव

ठाणे : टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. त्याच्यासह औरंगाबाद सोडणाऱ्या १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू आहे.
गरीब कुटुंबातील प्रेम गुडे (११) आणि विठ्ठल कुबेर (१३) अशी या मुलांची नावे असून ते औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. प्रेम हा सहावीत तर विठ्ठल दहावीत शिकतो. दोघे मंगळवारी शाळेत जाण्याच्या वेळेस घरातून निघाले. पण शाळेत न जाता रेल्वेने ते नाशिकला आले. दोन दिवस नाशिकला राहिल्यानंतर गुरुवारी दोघेही मुंबईत आले. कुर्ला रेल्वे ट्रॅक वर फिरताना रेल्वे पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे दोघांची चुकामूक झाली. प्रेम हा अंबरनाथला आला. तेथे तो चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या छाया चोपडे यांना सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला, चौघांनी आपले अपहरण करून मुंबईला आणले आणि त्यांची नजर चुकवून तेथून पळ काढल्याचे, सांगितले़ मात्र, अधिक विचारणा केल्यावर त्याने इंग्लिशच्या शिक्षिका मारतात, असे उत्तर दिले. त्यामुळे काहीतरी बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबून सत्य बाहेर काढले मित्रासोबत आपण पळून आलो असून कुठे हरवल्यास पुन्हा नाशिकला भेटू, असे त्याने मित्राला सांगितल्याची माहिती त्याने दिली. हा बनाव मालिकांमधील काही दृश्ये पाहून रचल्याची कबुली त्याने दिली.
0
सेना सत्तेच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली – भाजपा नेतृत्वाने शिवसेनेशी जुळवून घेत या सर्वांत जुन्या मित्रपक्षासोबत पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शिवसेना असो वा पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवून रालोआला बळकट बनविण्याचे ठरविले आहे.
शिवसेनेला विनाविलंब महाराष्ट्र सरकारमध्ये सामील करून घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि वित्त व सूचना आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली या भाजपाच्या ‘त्रिमूर्ती’ने घेतला आहे. याशिवाय केंद्रातील रालोआ सरकारमध्ये शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सत्तावाटपाच्या या नव्या फॉर्म्युल्यावर आणि सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. या नव्या व्यवस्थेचाच भाग म्हणून शिवसेनेनेही नरमाई दाखवीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून तडकाफडकी हटविले आहे.
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांसोबत या नव्या व्यवस्थेवर चर्चा करण्यास खासकरून कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांना मुंबईला पाठविण्यात आले. तसेच मागील १० दिवस पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावर असतानाच्या काळात अमित शहा आणि अरुण जेटली हे शिवसेना नेत्यांसोबत सतत फोनवर बोलत होते. या दोन्ही नेत्यांची गुरुवारी दिल्लीत मोदींसोबत चर्चा झाली. चर्चेत नव्या योजनेच्या अंमलबजावणीला अंतिम रूप देण्यात आले.
0
सेना-भाजपा नेत्यांचा राडा

उस्मानाबाद, दि. २२ – उस्मानाबाद येथे शिवसेनेचे रवी गायकवाड व भाजपाचे संजय निंबाळकर यांच्या दरम्यान जोरदार बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांदरम्यानही राडा झाला. एवढचं नव्हे तर भाजपा कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा सत्कारही करू दिला नाही.
सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले एकनाथ खडसे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी गेले असता खडसे यांचा सत्कार करण्यासाठी गायकवाड तेथे आले. मात्र भाजपा नेते संजय निंबाळकर यांनी त्यास आक्षेप नोंदवत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सेने भाजपाचा प्रचार केला नाही, असे सांगत गायकवाड यांना खडसेंचा सत्कार करू दिला नाही. या सर्व प्रकारानंतर गायकवाड व भाजपा नेत्यांदरम्यान बाचाबाची व धक्काबुक्कीही झाली.
0
राऊत, देसार्इंसह चौघांना प्रवक्तेपदावरून हटविले

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचा आक्षेप असणा-या खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या श्वेता परुळेकर यांचेही प्रवक्तेपद काढून घेण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाने पक्षात अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
पूर्वीच्या प्रवक्त्यांमध्ये आ. नीलम गोऱ्हे यांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या नव्या पॅनलमध्ये खा. अरविंद सावंत, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, आमदार विजय शिवतरे, अरविंद भोसले आणि भाजपातून आलेल्या डॉ. मनीषा कायंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
खा. संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरील उचलबांगडी चर्चेचा विषय बनली. मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत शरद पवार यांनी करताच खा. संजय राऊत यांनी भाजपाचे सरकार आम्ही पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचवेळी सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमात होते. तेथे त्यांनी आपण विरोधात बसू व हे सरकार टिकवण्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगितले होते. याआधीदेखील निवडणुकीच्या तोंडावर गुजराती समाजावर अग्रलेखातून राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘सामना’तून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेते नाराज आहेत. या सगळ्याचा परिपाक होऊन खा. राऊत यांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याचे समजते. मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभागही कमी झाला होता; तर सुभाष देसाई आणि परुळेकर हे प्रवक्ते असूनही माध्यमांमधील कोणत्याही चर्चेत फारसे कधीच सहभागी होत नव्हते.
0
लोकांची मनं जिंका – राज ठाकरे

पुणे – राजकारणात फक्त निवडणूक महत्वाची नसते लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणेही महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. लोकं तुमच्यापासून दूर गेली नाही तर तुम्हीच त्यांच्यात मिसळला नाहीत असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण केले व कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले.
पक्षाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर गेलात तर पक्षाच्या बाहेर जाल असे सांगत पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक वेळेसआंदोलनं, मारहाणं करूनच कामं होत नाहीत, लोकांशी चांगले संबंद प्रस्थापित करू, माणुसकीने वागूनही कामं करून घेतात येताता असा सल्ला त्यांनी दिला.तसेच कार्यकर्त्यांच्या होर्डिंगबाजीवरही त्यांनी नाराजी वर्तवली. होर्डिंग लावून कोणीही मोठा अथवा महान होत नसतो. यापुढे महाराष्ट्रात एकाही पदाधिका-याच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लागलेले दिसले तर दुस-या दिवसापासून तो पदावर राहिलेला दिसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. राजकारण म्हणजे समाजकारण असतते. फक्त रक्तदान शिबीरं, फळं आणि वह्या वाटप करत बसू नका तर लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवा. त्यांना काय हवयं ते विचारा, असं काम करा की तुम्ही त्यांच्या कायम लक्षात रहाल.
0
गावोगावी संविधानाचा जागर!

मुंबई- ‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम! समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा’ असा स्वातंत्र्य, समता न्याय आणि बंधुतेचा संदेश देणा-या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक शाळांत संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान दिना’चे औचित्य साधून प्रत्येक शाळांत संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेऊन ‘संविधान दिनी’ साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत.
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. ही तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना देशाचे जागरूक बनवणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार करण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाने संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
‘संविधान दिना’च्या निमित्त प्रत्येक शाळेत प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर संविधान यात्रा काढण्यात यावी, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळांत संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. शाळा व गावांत संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनासंविधानाबाबत माहिती होईल, असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आदेश डावलणा-यांवर कारवाई
संविधान दिनाच्या दिवशी सर्व शाळांत परिपाठ अथवा प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन दररोज करण्यासाठी मागील आघाडी सरकारने परिपत्रक काढून आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित शाळांकडून सर्रास हे आदेश डावलले जात असून अशा शाळांवर यापुढे कारवाई करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्याची माहिती विभागातील अधिका-यांकडून देण्यात आली.
0
आमदारांच्या नातवाचे रुग्णालयातून अपहरण

मुझफ्फरपूर- दोन अज्ञान महिलांनी जनता दल आणि भाजपा आमदारांच्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाचे रुग्णालयातून अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दलाचे आमदार दिनेश प्रसाद सिंह आणि भाजपाच्या आमदार वीणा देवी यांच्या नातवाचे बिहारमधल्या एका खासगी रुग्णालयातून अपहरण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिक्षक रणजीत कुमार मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस कसून तपास करत आहेत.
अभिषेक उर्फ राजा बाबू आणि त्यांची पत्नी खुशी यांना शुक्रवारी मुलगा झाला. त्याला पहाण्यासाठी दोन चांगल्या वेशभूषा असलेल्या महिला पहायला आल्या होत्या. थोडावेळ त्या नवजात बालकाशी खेळत राहिल्या आणि खुशीला झोप लागताच त्यांनी मुल घेऊन तेथून पोबारा केला.याप्रकरणी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तसेच प्रवेशद्वारावरील खासगी सुरक्षारक्षक अजयकुमार राय आणि कुमार राकेश या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच या दोन महिलांचे छायाचित्र संपूर्ण जिल्ह्यात लावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
दाऊद पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर

नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तान आश्रय देत असून त्याचे वास्तव्य सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिली.
राजधानीत एका वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. सिंह म्हणाले की, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आले तेव्हाही ही बाब त्यांच्या कानावर घातली होती. आता त्याला पकडण्यासाठी पाकिस्तानावर राजनैतिक दबाव वाढवण्यात येत आहे.
दाऊदला पकडण्यासाठी काही कालावधी द्या. याबाबतच्या धोरणात्मक बाबी जाहीर करू शकत नाही. मात्र, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले. भारतात थैमान घालणारे दहशतवादी संकट पूर्णपणे पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ ही दहशतवाद्यांना मदत करत आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा करण्याबाबत पाकिस्तान गंभीर नाही. त्यामुळेच याबाबतचा खटला अत्यंत संथगतीने सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. भारताला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या प्रत्येक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारताशी मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तानकडूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









