
जर्काता – पूर्व इंडोनेशियातील मलुकु बेट शनिवारी सकाळी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
कोटा टर्नेटपासून १५४ कि.मी. अंतरावर उत्तरपश्चिमेला असलेल्या समुद्रात ४६ कि.मी. आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदूपासून ३०० कि.मी. च्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा इशारा पॅसिफित त्सुनामी इशारा केंद्राने दिला आहे.
इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, तैवान आणि दक्षिण प्रशांत महासागारातील बेटांना त्सुनामीच्या लाटा धडकू शकतात असे पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे. तीस सेंटीमीटर ते एक मीटर उंचीच्या लाटा इंडोनेशियाच्या बेटांना धडकू शकतात तर, फिलिपाईन्समध्ये तीस सेंटीमीटर पेक्षा कमी उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Archive for November 15th, 2014
0
इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का
0
चीनकडून पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण
नवी दिल्ली – भारत विरोधी कारवायांमध्ये नेहमी पाकिस्तानला मदत करणारा चीन पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याला शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती समोर आली आहे.
सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार चीनी सैन्य पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराला शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहे. ही नेमकी कुठली शस्त्रास्त्रे आहेत ते सीमा सुरक्षा दलाने स्पष्ट केलेले नाही.
सीमेवर पाकिस्तानने काही महत्वाचे बदल केल्याचेही निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकांनी पाकिस्तानी रेंजर्सकडून काही चौक्यांचा ताबा घेतला आहे. आबोहार आणि गुरदासपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने नव्या टेहळणी चौक्या उभारल्या आहेत. बीएसएफच्या गुप्तचर अहवालानुसार, सीमेवर पाकिस्तानचे जे दूरध्वनी इंटरसेप्ट केले आहेत त्यातील संभाषणावरुन भारतीय जवान आणि मालमत्तेचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी मोक्याच्या जागांवर अचूक नेमबाज तैनात करण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये चीनी सैन्याच्या उपस्थितीचा मुद्दा भारताने अनेकदा चीनकडे व्दिपक्षीय चर्चे दरम्यान उपस्थित केला आहे. पण चीनने प्रत्येकवेळी पाकिस्तानातील पायाभूत प्रकल्पांमध्ये काम करणारे ते बांधकाम मजूर असल्याचा दावा केला.
0
छत्तीसगड सरकार लपवा छपवी करतेय – राहुल गांधी

बिलासपूर – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडला जाऊन नसबंदी शस्त्रक्रिय़ेनंतर मरण पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकार आपल्यावरील जबाबदारी टाळत असून, रमण सिंह सरकार लपवाछपवी करत आहे. ही निव्वळ दुर्लक्षाने घडलेली घटना नाही. यात भ्रष्टाचार असून बनावट औषधांचा वापर झाल्याचा आरोप राहुल यांनी केला.
बिलासपूरमधील ज्या शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या तेथे चांगली व्यवस्था नव्हती येथे आलेल्या अनेकांना इजा झाली होती. राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी टाळत असून, लपवा छपवी सुरु असल्याचे राहुल म्हणाले.
राहुल यांनी रुग्णालयालाही भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या महिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिलासपूरमधील नसबंदी शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेणा-या १३ महिलांचा मृत्यू झाला असून, १३८ महिला आजारी आहेत. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडणारे डॉ. आर.के. गुप्ता यांना अटक केली आहे. डॉ. गुप्तांना मदत करणारे डॉक्टर आणि सहका-यांचा पोलिस शोध घेत आहेत.
0
नालासोपाऱ्यात भीषण स्फोट

नालासोपारा -नालासोपाऱ्यातील एम. डी. नगर येथे एका इमारतीत आज (शनिवार) सकाळी एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बी विंगमधील तळमजल्यावरील पांडे यांच्या घरातील लाईट सुरु करताच जोरदार स्फोट झाल्याने एकच खळबळ माजली. स्फोटाचे नेमके कारण समजलेले नसले तरीही घरात गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने याचा फटका इतर विंगमधील घरांनादेखील बसला असून या घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते आहे.
स्फोटामुळे घरातील अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
0
काँग्रेसकडून राज्यपालांची माफी

मुंबई -विधानभवनात गाडी अडवण्याचा केलेला प्रकार आणि त्या गदारोळात झालेल्या धक्काबुक्कीबद्दल काँग्रेस आमदारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची क्षमा मागितली आहे. राज्यातील भाजप सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करायला सांगावं, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, तेव्हाच झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गेल्या बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विधानसभेत ‘विश्वास’ जिंकला. परंतु, त्यांनी आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपनं नैतिकता गुंडाळून ठेवली, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचा ठपका बसू नये म्हणून आवाजी मतदानाची खेळी केली, अशी टीका शिवसेना आणि काँग्रेसनं त्याच दिवशी केली. या विश्वासमताच्या विरोधात राज्यपालांकडे दाद मागून, सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं. त्यानुसारच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळानं राजभवनवर सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आपण द्यावेत, अशा आशयाचं निवेदन काँग्रेसनं राज्यपालांना दिलंय. बहुमत सिद्ध होईपर्यंत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यास त्यांना संमती देऊ नये, अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली आहे. त्याचवेळी, विधानभवन परिसरात केलेल्या गोंधळाबद्दल काँग्रेसनं राव यांची माफी मागितली. भाजपनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली होती आणि त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी पाच काँग्रेस आमदारांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
0
व्यापाऱ्याची हत्या,तिघांना अटक

मुंबई -पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सायन येथे राहणाऱ्या व्यापाराचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. परंतु, खंडणी मागतिल्यानंतर लगेचच या अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह माळशेज घाटात फेकून दिला होता. सायन येथे राहणाऱ्या स्वामीनारायण सत्वानी (६५) या भंगार विक्रेत्याचे जून २०१३ मध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या अपहरणाची तक्रार सायन पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. क्राइम ब्रँचच्या युनिट चारनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. काही दिवसांनी अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांच्या मोबाइलवरून जोधपूर येथे राहणाऱ्या सत्वानी यांच्या कुटुंबियांना फोन करून त्यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. सत्वानींच्या कुटुंबियांनी तातडीने याची तक्रार जोधपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. दरम्यान, अपहरणकर्ते सत्वानी यांना घेऊन सतत आपला ठावठिकाणा बदलत होते. ते दिल्लीलाही गेले आणि त्यानंतर माळशेज घाटात नेऊन अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांची हत्या केली. अपहरकर्त्यांना पाहणाऱ्या एका साक्षीदाराने क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना त्याविषयी माहिती दिली त्यावरून त्यांचे स्केच काढण्यात आले. स्केचच्याच आधारे पोलिसांनी बदलापूर-वांगणी येथून विशाल दुगाडे (२९), आबिद अन्वर महाबले (३६), मिथुन उन्नीकृष्णन पल्लिई (३३) यांना अटक केली. अन्वर सिद्दीकी हा चौथा आरोपी फरार आहे. दरम्यान, सत्वानी यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
0
CPM कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले

तंजावूर -तमिळनाडूतील तंजावूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तिंनी तीन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली. या हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनास्थळावर क्रूड बॉम्बचे काही तुकडे सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. कम्युनिस्ट पार्टीतर्फे या भागात वाळू माफियाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात काही राजकीय नेते अस्वस्थ होते, अशी माहिती सीपीएमच्या नेत्याने दिली.
0
आधारभूत योजनेअंतर्गत जिल्ह्यात कापूस खरेदी

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील काही केंद्रावर आधारभूत दरानुसार कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत योजनेअंतर्गत विक्री करीता आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज महासंघाच्यावतीने 27 केंद्रावर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी 73 केंद्र उघडणे प्रस्तावीत आहे. अशी एकूण 100 खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. कापसाची खरेदी शासनाच्या एफएक्यू नॉर्म्स प्रमाणे राहणार आहे. कापसाची आद्रता 12 टक्याच्या वर असल्यास कापूस स्विकारला जाणार नाही. शेतकऱ्यांना कापसाची रक्कम तिन दिवसांच्या आत अदा केली जाणार आहे. कापसाचे दर एलआरए 5166 जातीला 3850 रुपये, एच 4/एच6 जातीला 3950 तर बन्नी / ब्रम्हा जातीला 4050रु. इतका भाव केंद्र शासनाने जाहिर केल्या प्रमाणे देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी सातबारा सोबत आणावा. असे कापूस पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांनी कळविले आहे.
0
दगडी प्रशासकीय ईमारत परिसरात स्वच्छता मोहिम
यवतमाळ : येथील तहसिल चौकातील दगडी प्रशासकीय ईमारत परिसरात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ईमारतीच्या सातही शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यवतमाळ नगर परिषदेच्या सहकार्याने ही मोहिम राबविण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, प्र. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वसंत मते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद रामशेट्टीवार, सहकार विभागाचे कार्यालय अधिक्षक गजानन वडेकर यांच्यासह सातही कार्यालयाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वत: हातात झाडू घेवून संपूर्ण
ईमारत परिसराची साफसफाई केली. नगर परिषदच्यावतीने परिसरात जमा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकुन परिसरात साचलेला जाळण्यायोग्य कचरा यावेळी कर्मचाऱ्यांनी जमा करुन जाळून नष्ट केला. आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर स्वच्छ झाला असून यापुढे परिसर रोज स्वच्छ करण्याचा
संकल्प सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. या अभियानात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय जिल्हा ग्रंथालय, ॲन्टी करप्शन कार्यालय आदी कार्यालये सहभागी झाले होते.










